Aurangabad | शहराचं पाणी वाढवण्यासाठी आजपासून मनपाची मोहीम, हर्सूल तलावातून अतिरिक्त पाणी उपसा करणार

| Updated on: May 09, 2022 | 9:42 AM

हर्सूल तलावातून दररोज किमान 6 एमएलडी पाणीउपसा होत असून तो दिवसाला 08 ते 10 एमएलडीपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Aurangabad | शहराचं पाणी वाढवण्यासाठी आजपासून मनपाची मोहीम, हर्सूल तलावातून अतिरिक्त पाणी उपसा करणार
Follow us on

औरंगाबादः उन्हाळ्यामुळे शहरातील पाण्याची मागणी (Water demand) दिवसेंदिवस वाढत आहे. जायकवाडी जलायशयातून येणारे पाणी अपुरे पडत असल्याने आता हर्सूल तलावातून (Harsul Lake) अतिरिक्त पाणी उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी या तलावापासून जटवाडा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत स्वतंत्र वाहिनी टाकण्यात येत आहे. आजपासून महापालिकेने (Aurangabad municipal corporation) ही मोहीम हाती घेतली असून यानंतर तरी शहराची पाण्याची तहान भागतेय का? शहराला चार दिवसांनी पाणीपुरवठा होऊ शकेल का? असे प्रश्न नागरिकांना पडले आहे. दरम्यान, महापालिकेने रविवारीच यासाठी लागणारे पाइप ओआणून ठेवले असून आज सोमवारपासून अतिरिक्त पाणीउपसासाठीचे काम सुरु होणार आहे.

किती पाणी उपसा वाढवणार?

हर्सूल तलावाची 28 फुटांची क्षमता आहे. वर्षभरात 08 फूट पाणी कमी झाले. तलावात सध्या 20 फूट पाणी आहे.  त्यामुळे मे महिन्यात शहराला पाणी मिळू शकते, असा महापालिकेचा अंदाज आहे. पाण्याचा उपसा वाढवण्यासाठी 350 मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी हर्सूल तलाव ते जटवाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकण्यात येणार आहे. हे अंतर 700 मीटर एवढे आहे. रविवारी पाइप आणण्यात आले. तीन ते चार दिवसात जलवाहिनी टाकण्याचे काम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या कामावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मनपाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. हर्सूल तलावातून दररोज किमान 6 एमएलडी पाणीउपसा होत असून तो दिवसाला 08 ते 10 एमएलडीपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सिडकोला एमआयडीसीची मदत

सिडको एन-1 भागात एमआयडीसीचे पंप हाऊस असून तेथून मनपा कंत्राटदाराचे काही टँकर भरण्यात येतात. एमआयडीसीने शनिवारी 40 ते 45 टँकर भरून दिले. उन्हाळा संपेपर्यंत रोज एक एमएलडी पाणी एमआयडीसी मनपाला देणार आहे. त्यामुळे एन-5 आणि एम-7 येथील जलकुंभाला दिलासा मिळाला. शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत एवढा असंतोष का आहे, याचे कारण शोधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी मनपाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत एक बैठक घेणार आहेत.