ZP Election | औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच, 90% प्रारुप आराखडा मंजूर

| Updated on: Feb 14, 2022 | 4:06 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील सध्याच्या जिल्हा परिषदेवर आघाडीची सत्ता आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या मीना शेळके यांच्याकडे आहे. तर उपाध्यक्षपदी भाजपच्या एल.जी. गायकवाड आहेत.

ZP Election | औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच, 90% प्रारुप आराखडा मंजूर
Follow us on

औरंगाबादः संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांची (ZP Election) रणधुमाळी अवघ्या काही दिवसांत सुरु होण्याची चिन्हे आहेत. कारण राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) जिल्हा परिषद निवडणुकीचा 90 टक्के प्रारुप आराखडा मंजूर केला आहे. जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांचा प्रारुप आराखडा जिल्हा परिषदेने निवडणुक आयोगाकडे  पाठवला होता. शनिवारी सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी तपासणीसाठी राज्य निवडणूक आयोगासमोर हा आराखडा (Draft Plan) सादर केला होता. आयोगाने यातील 90 % आराखडा योग्य ठरवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी उर्वरीत दुरुस्ती झाल्यानंतर हा आराखडा मंजूर होण्याची शक्यता आहे. यंदा जिल्हा परिषदेसाठी 70 तर पंचायत समित्यांसाठी एकूण 140 गण निश्चित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दोन गटांच्या रचनेत दुरुस्ती

आयोगाने औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रारुप आराखडा बहुतांश प्रमाणात योग्य ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र दोन गटांच्या रचनेत लोकसंख्या आणि सीमेबाबत थोडी दुरुस्ती करणे आवश्यक असल्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे उद्या मंगळवारी दुरुस्तीसह हा आराखडा पुन्हा तपासणीसाठी सादर केला जाईल. त्यानंतर हाही आराखडा मंजूर झाल्यास निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

विद्यमान जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता?

औरंगाबाद जिल्ह्यातील सध्याच्या जिल्हा परिषदेवर आघाडीची सत्ता आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या मीना शेळके यांच्याकडे आहे. तर उपाध्यक्षपदी भाजपच्या एल.जी. गायकवाड आहेत. सभापती पदात शिवसेनेच्या वाट्याला तीन तर भाजपकडे एक पद आहे. राष्ट्रवादीचे तीन सदस्य असल्यामुळे महाविकास आघाडीकरिता राष्ट्रवादीला आणखी बळ लावावे लागणार आहे.

जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह आरपीआय डेमोक्रेटिक पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषदेत तालुक्यानिहाय पक्षाची ताकद पाहिल्यास, खुलताबाद तालुका भाजपच्या ताब्यात आहे तर औरंगाबाद तालुक्यात काँग्रेस आणि पैठण तालुका शिवसेनेच्या ताब्यात आहे. गंगापू-सिल्लोड तालुक्यात शिवसेना-भाजपचे सदस्य आहेत. तर तालुक्यांमध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काग्रेस अशा सगळ्याच पक्षातील सदस्य आहेत. यंदा काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार का, हे पुढील काही दिवसात ठरेल. भाजप मात्र स्वबळावर निवढणूक लढवण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

भाजप – 23
शिवसेना- 17
काँग्रेस- 15
राष्ट्रवादी काँग्रेस- 3
मनसे- 1
आरपीआय (डे.)- 1

इतर बातम्या-

Nanded | माहूर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे फेरोज दोसानी, नांदेड काँग्रेसला मोठा झटका, शिवसेना किंगमेकर!

प्रेम प्रेम सगळं खरंय हो, पण वेळीच पारखून घेणंही महत्त्वाचं आहे, ऐन व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला महिलेची दिल्ली ते बीड फरफट!