लखलखल्या औरंगाबादच्या ऐतिहासिक वास्तू, 100 कोटी लसीकरण झाल्यानिमित्त देशभरातील वास्तू झळकणार

| Updated on: Oct 14, 2021 | 4:42 PM

देशाने 100 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केल्याचा विजयी जल्लोष औरंगाबादमध्येही साजरा होत आहे. औरंगाबाद केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे असलेल्या बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला आणि अहमदनगर येथील सलाबत खान का मकबरा या ठिकाणी राष्ट्रध्वज रोषणाईतून साकारण्यात आला आहे.

लखलखल्या औरंगाबादच्या ऐतिहासिक वास्तू, 100 कोटी लसीकरण झाल्यानिमित्त देशभरातील वास्तू झळकणार
औरंगाबादमधील बीबी का मकबरा आणि दौलताबादमधील मिनारवरील सुंदर विद्युतरोषणाई
Follow us on

औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने राज्यासह (Corona Vaccination) देशभरात वेग पकडला आहे. देशातील 100 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. यानिमित्त देशभरातील सुमारे 100 प्राचीन ऐतिहासिक वास्तुंवर (Aurangabad Historical Monuments) विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ऐतिहासिक वास्तुंसाठी जगप्रसिद्ध असलेल्या औरंगाबादमधील वास्तुदेखील प्रकाशमान झाल्या आहेत. पुरातत्त्व खात्यातर्फे शहरातील ऐतिहासिक वास्तूंवर रंगीत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

गुरुवारपासून नागरिकांसाठी खुली

देशाने 100 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केल्याचा विजयी जल्लोष औरंगाबादमध्येही साजरा होत आहे. औरंगाबाद केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे असलेल्या बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला आणि अहमदनगर येथील सलाबत खान का मकबरा या ठिकाणी राष्ट्रध्वज रोषणाईतून साकारण्यात आला आहे. गुरुवारपासून ही रोषणाई सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुली झाली आहे.

जिल्ह्यातील 18 टक्केच नागरिकांचे दोन डोस

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील 50 टक्के नागरिकांनीच कोव्हिड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर 18 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतल्याची बाब बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीसमोर आली. आरोग्य विभागाकडून मुबलक प्रमाणात लसीचा साठा सध्या उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकार राबवत असलेल्या मिशन कवच कुंडलअंतर्गत 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी दिली.

ग्रामीण भागातीन नागरिकांचा थंड प्रतिसाद

सध्या 18 वर्षांवरील व्यक्तींना कोव्हिडची लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनी दुसरी लस घेता येते. असे असतानाही ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी गटणे यांनी सांगितले की, आपल्याकडे उपलब्ध आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स यांची संख्या पाहता जिल्ह्यात दररोज 20 हजार नागरिकांचे लसीकरण केले जाऊ शकते. मात्र हे लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे.

बुधवारी कोरोनाचे जिल्ह्यात 21 रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नवे 21 रुग्ण आढळून आले. यात शहरातील पाच तर ग्रामीण भागात 16 जणांचा समावेश आहे. दिवसभरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच बरे झालेल्या 15 जणांना (शहर 5, ग्रामीण 10) डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 1 लाख 48 हजार 925 झाली आहे. त्यापैकी 1 लाख 45 हजार 173 जण बरे होऊन घरी गेले आहेत. बळींची संख्या 3592 झाली आहे. सध्या 160 जणांवर उपचार सुरू आहेत.

इतर बातम्या

गावपातळीवर लसीकरणाचे नियोजन करा; नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश