Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा; सरकारला घामटा फुटणार?

| Updated on: Oct 22, 2023 | 3:29 PM

24 तारखेच्या आत आरक्षण दिलं नाही तर आम्ही दोन टप्प्यात आंदोलन करू. 25 तारखेला आमरण उपोषण करू. ते झेपणार नाही. त्यानंतर 28 तारखेनंतर दुसरं आंदोलन करू. ते आंदोलन मात्र सरकारला पेलणारन नाही. हे शांततेचं युद्ध असेल. ते देश पाहिल.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा; सरकारला घामटा फुटणार?
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 22 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकारविरोधातील आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. राज्य सरकारने 24 तारखेच्या आत आरक्षण दिलं नाही तर 25 तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच 25 ऑक्टोबरपासून गावागावातील मराठा समाज सर्कलवर येऊन साखळी उपोषण करणार आहे. अख्खं गावचं उपोषणाला बसणार आहे, असं सांगतानाच जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही वैधानिक पदावर असलेल्या राजकीय नेत्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेऊन उपोषणाची घोषणा केली. राज्य सरकारने जर 24 तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून मी समाजाला न्याय मिळावा म्हणून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे. मराठा समाजाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचं. नाही तर आमच्या गावाची वेसही शिवू देणार नाही. राजकीय नेत्यांना म्हणजे आमदार, खासदार आणि मंत्र्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

गावागावात साखळी उपोषण

25 तारखेपासून सर्व गावातून प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. आम्ही ताकदीने साखळी उपोषण करू. त्यानंतर 28 तारखेपासून त्याचं रुपांतर आमरण उपोषणात होईल. सर्कल निहाय तयारी मराठा समाजाने केली आहे. सर्व गावांनी सर्कलच्या ठिकाणी कायमस्वरुपी बसून उपोषण करायचं आहे, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.

कँडल मार्च काढा

प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात प्रचंड संख्येने मराठा समाजाने एकत्र येऊन कँडल मार्च काढायचा आहे. हे शांततेचं आंदोलन असेल. आंदोलन सुरू झाल्यावर ते सरकारला झेपणार नाही. त्यानंतर 25 तारखेला पुढच्या आंदोलनाची दिशा सांगणार आहोत. ती पेलणार नाही. उपोषण सुरू झाल्यावर सांगू. दोन टप्प्यात आंदोलन करू. त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

आंदोलन झेपणार नाही

आमरण उपोषण आणि सर्कलचे साखळी उपोषण ताकदीने सुरू होणार आहे. चार दिवसात तुम्हाला आमचं आंदोलन झेपणार नाही. पण 25 तारखेला 28 तारखेच्या आंदोलनाची दिशा सांगितली जाईल. जी दिशा सांगितली जाईल ती सरकारला पेलणार नाही. तुमच्यासाठी सोप्पं असेल. पण आंदोलन सुरू झाल्यावर झेपणार नाही. हे शांततेचं युद्ध असेल. ते तुम्हाला झेपणार नाही. ते तुम्हाला पेलणार नाही. त्याची दखल घ्या. 24तारखेच्या आत आरक्षण द्या, असं ते म्हणाले.