Aurangabad | मनसेच्या अल्टीमेटमला काय प्रतिसाद? मशिदींत अजान झाली? मराठवाड्यात काय स्थिती?

| Updated on: May 04, 2022 | 12:33 PM

दिलेल्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी मनसैनिकांची कालपासूनच धरपकड सुरु केली. कुठलाही अनुचिच प्रकार घडू नये, यासाठी धार्मिक स्थळांबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Aurangabad | मनसेच्या अल्टीमेटमला काय प्रतिसाद? मशिदींत अजान झाली? मराठवाड्यात काय स्थिती?
उस्मानाबाद, नांदेड आणि बीडमधील चित्र
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 04 मे रोजी राज्यभरातील मशिदींवरचे भोंगे उतरले पाहिजेत, असा अल्टिमेटम दिला, त्यानंतर आज राज्यभरातील विविध शहरात त्याचे पडसाद दिसून आले. ज्या औरंगाबादमध्ये राज ठाकरेंनी हा इशारा दिला, त्या शहरातील मशिदींमध्ये लाऊड स्पीकरवर (Loud Speaker) अजान झाली, मात्र ती अत्यंत कमी आवाजात वाजवण्यात आली. काही मशिदींमध्ये तर लाऊडस्पीकरवर अजान झालीच नाही. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हीच स्थिती दिसून आली. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी मनसैनिकांची कालपासूनच धरपकड सुरु केली. कुठलाही अनुचिच प्रकार घडू नये, यासाठी धार्मिक स्थळांबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

औरंगाबादेत अजान झाली?

राज ठाकरे यांनी मशिदींवरील अजान मोठ्या आवाजात वाजल्यास कार्यकर्त्यांना भोंगे उतरवण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानुसार औरंगाबादेतील मशिदींमध्ये आज अजान झाली. मात्र लाऊडस्पीकरचा आवाज कमी ठेवण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केल्याची प्रतिक्रिया मुस्लिम बांधवानी दिली. दुसरीकडे शहरातील कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनीही तगडा बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे अनेक मशिदींबाहेर शांततेचं वातावरण दिसून आलं.

नांदेडमध्ये अजान शांततेत

नांदेडमध्येही राज ठाकरे यांच्या अल्टिमेटममुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता होती. त्यादृष्टीने पोलीसही सतर्क झाले होते. नांदेड पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसाही बजावल्या होत्या. शहरातील धार्मिक स्थळांबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. आज पहाटेचं नमाज पठण शांततेत पार पडलं तसंच दैनंदिन व्यवहारही सुरळीत सुरु आहेत.

उस्मानाबादेत काय स्थिती?

मनसेचे राज ठाकरे यांनी अलटीमेटम दिल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात शांतता आहे. सकाळची नमाज शांततेत पार पडली त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून संवेदनशील भागात राज्य राखीव दल, होमगार्ड व पोलीस दल तैनात केले आहे.तर जवळपास 100 मनसे पदाधिकारी यांना CRPC 149 नुसार नोटीस दिल्या आहेत.शहरा

परभणीत लाऊडस्पीकरवर अजान

राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमचा परभणीत फार परिणाम दिसून आला नाही. परभणी शहरासह जिल्हाभरात मनसेच्या अल्टीमेटमचा कुठलाही प्रभाव आढळून आलेला नाही. नियमाप्रमाणं प्रत्येक मशिदीमध्ये लाऊडस्पीकरवर अजान आणि नमाज पठण करण्यात आले. तसेच पोलीस प्रशासनाकडूनही मनसे कार्यकर्त्यांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

बीडमध्ये मनसेकडून मुस्लिमांचे आभार

राज्यात एकीकडे भोंग्याचं राजकारण तापले असताना बीडमध्ये मात्र एक अनोखं चित्र पाहायला मिळालं. जिल्ह्यातील प्रसिद्ध असणाऱ्या नारायण गड, राम गड आणि बंकट स्वामी संस्थानच्या महंतांनी मुस्लीम बांधवांबरोबर ईद साजरी केली आहे. तर मुस्लिम बांधवांनी देखील महंतांचा सन्मान करून अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्यात. दरम्यान सध्या भोंग्याचं राजकारण सुरू असताना बीडमध्ये मात्र हिंदू- मुस्लिमांत एकोपा आणि समतेचे अनोखे दर्शन पहावयास मिळाले आहे.
तसेच बीडमधील अनेक भागात मशिदींवर कमी आवाजात नमाज अदा करण्यात आली. तसेच मनसे कार्यकर्त्यांकडून लाऊड स्पीकर न लावता हनुमान चालिसा पठण करण्यात आली.