औरंगाबाद-पुणेदरम्यान लवकरच सहापदरी ‘एक्सप्रेस वे’, नितीन गडकरींसमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत सादरीकरण

| Updated on: Oct 12, 2021 | 6:12 PM

या आराखड्याचे सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे सादरीकरण करण्यात आले.

औरंगाबाद-पुणेदरम्यान लवकरच सहापदरी एक्सप्रेस वे, नितीन गडकरींसमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत सादरीकरण
औरंगाबाद ते पुणे रस्ता लवकरच सहा पदरी करणार
Follow us on

औरंगाबाद: पुणे आणि औरंगाबाद दरम्यान लवकरच सहा पदरी एक्सप्रेस वे तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्राथमिक आराखडा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केला आहे. या आराखड्याचे सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढे सादरीकरण करण्यात आले. औरंगाबाद ते पुणे या मार्गावर पुणे ते शिरूरदरम्यान उड्डाणपूल राहणार आहे.

औरंगाबादच्या उद्योगवाढीसाठी अनुकूल

औरंगाबादच्या उद्योगवाढीसाठी औरंगाबाद ते पुणे हा मार्ग सहापदरी करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र आता हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच्या शासनस्तरावरील हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा मार्ग प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

सध्या औरंगाबाद ते पुणे 6 तासांचे अंतर

सध्या औरंगाबादहून पुण्याला जाण्यासाठी सहा तासांचा कालावधी लागतो. केंद्र सरकारने देशभरात द्रुतगती मार्ग तयार करण्याचे नियोजन केले असून त्यातील टप्पा क्रमांक 2 मध्ये पुणे-औरंगाबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचा समावेश आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. सद्या अस्तित्वात असलेला मार्ग वगळून नव्याने ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे केला जाणार आहे. या मार्गासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनाबाबत देखील चर्चा या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीला विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारीदेखील सहभागी झाले होते.

औरंगाबाद ते पैठण चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा

पैठण ते औरंगाबाद  या रस्त्याच्या चौपदीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळलेला आहे.  पैठण-औरंगाबाद रोडचा डीपीआर तयार झाला असून लवकर भूसंपादन होणार आहे. रोजगार व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे  यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची  मागील आठवड्यात भेट घेतली. त्यानंतर पैठण-औरंगाबाद चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. या रस्त्यासाठी 1900 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या रस्त्याची 20 मीटर रुंदी असणार आहे. तीन ठिकाणी बायपास असणार असून तीन ठिकाणी उड्डाणपूल असणार आहेत. ढोरकीन, बिडकीन व आणखी एक बायपास असणार आहे. यात तीन ठिकाणी उडाणपूल यासाठी असणार आहेत. यासाठी 118 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी 900कोटी रुपये तर रोडसाठी एक हजार कोटींची तरतूद होणार आहे. या चौपदरीकरणाचा डीपीआर तयार करण्यात आला असून मार्चमध्ये टेंडर निघणार आहे. या डिसेंबरमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू होइल, अशी माहिती नॅशनल हायवेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

इतर बातम्या-

एका दिवसात 30 कि.मी. रस्त्याचं डांबरीकरण, महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त अनोखा विक्रम

“पाच-सहा वर्षात काय दिवे लावले ?” बैठकीतच आमदारांना प्रश्न, रस्त्याच्या कामावरुन नागरिक आक्रमक