औरंगाबादेत फक्त ग्रीन फटाक्यांना परवानगी, 500 च्या पुढची लड चालणार नाही, वाचा आणखी कोणते नियम?

| Updated on: Nov 02, 2021 | 12:54 PM

दिवाळीनिमित्त औरंगाबाद शहारत रात्री 8 ते 10 या काळातच फटाके उडवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी झाली आहे. तसेच सुधारीत ग्रीन फटाक्यांचीच मागणी ग्राहकांनी विक्रेत्यांकडे करावी, असे आवाहान प्रशासनाने केले आहे.

औरंगाबादेत फक्त ग्रीन फटाक्यांना परवानगी, 500 च्या पुढची लड चालणार नाही, वाचा आणखी कोणते नियम?
औरंगाबाद शहरात फटाक्यांसाठीची नियमावली जाहीर
Follow us on

औरंगाबादः दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाने काही नियमावली घालून दिली आहे. त्यानुसार दिवाळीत फक्त हरित फटाकेच वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच 500 आणि एक एकर फटाक्यांची लड लावण्यावर, बेरियम सॉल्ट केमिकल असलेल्या फटाक्यांवर पूर्णपणे बंदी आहे, अशी माहिती औरंगाबादचे  पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता (Nikhil Gupta) आणि जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

शहरात फटाक्यांसाठी काय आहेत नियम?

– लोकांनी विक्रेत्यांकडे सुधारित ग्रीन फटाक्यांचीच मागणी करावी
– मोठी लड किंवा 500 च्या पुढे फटाके असलेली लड घेऊ नये.
– ऑनलाइन फटाके मागवू नयेत.
– बेरियम सॉल्ट केमिकल असलेल्या फटाक्यांवर बंदी आहे.
– लिथियम अल्सेनिक असलेले फटाके घेऊ नयेत
– 125 डेसिबल आवाज करणारे फटाके वापरणे टाळावे.
– नागरिकांना माहिती नसली तरीही प्रशासनाकडून याची तपासणी केली जाणार आहे.
– मोठ्या आवाजाचे फटाके वाजवणे टाळावे.
– रात्री 8 ते 10 या कालावधीतच फटाके वाजवावेत.
– आपल्या आजू-बाजूच्या लहान मुले, वृद्धांची काळजी घेऊन, ध्वनी व हवेचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
– शांतता झोनच्या 100 मीटर परिसरात फटाके वाजवू नयेत. शांतता झोन म्हणजे न्यायालय, हॉस्पिटल, नर्सिंग रुम इत्यादी.
– नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचे पथक कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिला आहे.

सुधारीत फटाके आणि ग्रीन फटाक्यांमध्ये संभ्रम

जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारीत फटाके वापरण्याची परवानगी दिली आहे. मात्र सुधारीत फटाके आणि ग्रीन फटाके यामधील नेमका फरक आम्हाला माहिती नाही, असे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शहरात जाहीर झालेल्या नियमावलीचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. प्रशासनाच्या वतीने आम्ही शहरात अचानक भेटी देऊ, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. तर दिवाळीनंतर हवेच्या गुणवत्तेवर काय परिणाम झाला, हेदेखील प्रदूषण नियंत्रण मंजळाकडून तपासण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या- 

आधी शहर स्वच्छ करा, मग नाव बदलण्याच्या फालतू चर्चा करा, औरंगाबादमध्ये लेखक अरविंद जगताप यांचे वक्तव्य

Crime: बचत गटवाल्या चौकडीने औरंगाबादेतल्या वकील महिलेलाही फसवलं, 18 लाखांचा गंडा घातल्याचं उघड