औरंगाबाद टॉप 5: दिवस आंदोलनांचे, ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक, तर इतर पक्षही निदर्शनांच्या पवित्र्यात

| Updated on: Sep 15, 2021 | 12:42 PM

औरंगाबादमध्ये आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तसेच आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आहे.

औरंगाबाद टॉप 5: दिवस आंदोलनांचे, ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक, तर इतर पक्षही निदर्शनांच्या पवित्र्यात
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपची जिल्हाभरात तीव्र आंदोलनं
Follow us on

1- ओबीसी आरक्षण रद्दच्या विरोधात भाजप आक्रमक

महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्य सरकारला निवडणुका घेण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार नाही, तो निवडणूक आयोगाला आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे येत्या 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी राज्यात विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) धारेवर धरलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधी आणि न्याय विभागाने व्यवस्थित बाजू न मांडल्याने आरक्षण गेल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule)  यांनी केला आहे. या धर्तीवर औरंगाबादेत आज विविध तालुक्यांमध्ये भाजपची तीव्र आंदोलने होत आहेत. शहरात केंब्रिज चौक, वाळूजमध्ये बजाजनगर, ओअॅसिस चौक, खुलताबाद, पैठण तहसील कार्यालय आदी महत्त्वाच्या ठिकाणी भाजपचे हे आंदोलन सुरु आहे.

2. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन गाजणार

येत्या 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या निमित्त विविध पक्षांनी आपल्या मागण्यांसाठी तसेच सरकारच्या धोरणावर टीका करण्यासाठी मोर्चा आणि आंदोलनांचे नियोजन केले आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून अडवला जाणार आहे. तर शहरात शिवसेनेनं पक्षातर्फे कोणकोणती विकासकामं केली, याचा प्रचार केला जात आहे. त्याविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील उपरोधिक निदर्शनं करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला तुतारी वाजवून तसेच पुष्पवृष्टी करून त्यांचे धन्यवाद देणार असल्याची माहिती खासदार जलील यांनी दिली. त्यामुळे मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादच्या दृष्टीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा हा कार्यक्रम अनेक राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार आहे.

3. तापाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ, घरटी एक रुगण

औरंगाबाद शहरातील ताप, अंगदुखी, सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरातील घाटी रुग्णालयातील बालरोग विभागातही रुग्ण वाढले आहेत. इथे एका खाटेवर दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस, वातावरणातील अचानक होणारे बदल आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे तापेची साथ आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तरीही नागरिकांनी आपले घर, अंगण आणि परिसरात कुठेही साचलेले पाणी राहू देऊ नये, तसे असल्यास परिसराची त्वरीत स्वच्छता करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच ताप, अंगदुखीची प्राथमिक लक्षणे असल्यास त्यावर लक्ष ठेवून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.

4. गुन्हेः अवैध बायोडिझेलच्या साठ्यावर छापा, 23 लाख 40 हजारांचा माल जप्त

मुंबई-नागपूर महामार्गावरील साजापूर शिवारात अवैध रितीने बायोडिझेलची विक्री करणाऱ्या ट्रान्सपोर्टरवर औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 16 हजार लिटर डिझेल, एक ट्रक आणि इतर वस्तू असा 23 लाख 40 हजारांचा माल जप्त करण्यात आला. मागील महिन्यात याच कंपनीतून बायो डिझेलचा पंप महसूल विभागाने सील केला होता. याप्रकरणी पंपचालक सय्यद इरफान, जमील कुरेशी, कामगार शेख इम्रान शेख उस्मान व शेख रहीम शेख रशीद या दौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इरफान आणि जमील हे अवैधरीत्या बायो डिझेलचा पंप थाटून 78 रुपये लीटर या प्रमाणे विक्री करत होते. इंधन विक्री करण्यासाठी या आरोपींनी बंद पडलेल्या फ्रिजचा वापर करून त्याला पंपचे हँडल बसवले. याद्वारे त्यातूनच डिझेलची विक्री सुरु होती.

5. औरंगाबादेत चर्चा फरशीवर बसलेल्या सहाय्यक कुलसिचवांची

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दुरव्यवस्थेचा नमूना समोर आला आहे. विद्यापीठात सहाय्यक कुलसचिव पदावर असलेल्या महिला अधिकाऱ्याला आपल्या कार्यालयात चक्क फरशीवर बसून कामकाज करावे लागत आहे. हेमलता ठाकरे या विद्यापीठात सहायक कुलसचिव आहेत. पूर्वी त्या परीक्षा विभागात होत्या. तीन महिन्यांपूर्वी अचानक त्यांची बदली पीजी विभागात करण्यात आली. बदली आदेश मिळताच त्या पदभार घेण्यासाठी पीजी विभागात गेल्या. तेथील परिस्थिती धक्कादायक होती. त्यांच्यासाठी केबिन नाही, टेबल खुर्चीही नाही. त्यामुळे हेमलता ठाकरे या गेल्या महिन्यापासून फरशीवर बसूनच काम करत आहेत. हे चित्र अत्यंत वेदनादायी असून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. या महिला अधिकाऱ्याची भेट काल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने घेण्यात आली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा रिपाइंचे मराठवाडा युवक अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी दिला आहे.
इतर बातम्या- 

Aurangabad | एकाच बेडवर 2-2 मुलांवर उपचार, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात चिमुकल्यांची गर्दी 

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा राज्यात डंका, महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट म्हणून घोषित