सुट्ट्या तेल बंदीची सामान्यांना झळ, तुकाराम मुंढे साहेब आम्ही खायचं तरी काय ? हातावरचे पोट असणाऱ्यांचा सवाल
FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुट्टे तेल विक्रीचे फर्मान काढल्याने अनेक किराणा दुकानात सुट्टं खाद्यतेल मिळणार नाही अशा आशयाच्या पाट्या लागल्या आहेत.सुट्ट खाद्यतेल घेण्यासाठी हातात कॅन घेऊन आलेल्या नागरिकांना माघारी फिरावं लागत आहे.

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न भेसळ विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. एकीकडे त्यांच्या या कारवाईने मध्यमवर्गीय आणि सुखवस्तू कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण असताना आता हातावरचे पोट असणाऱ्या आणि रोजचा किराणा खरेदी करुन घराची चुल पेटवणारा गरीब मात्र यात भरडला गेला आहे.याला सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी जबाबदार ठरली आहे.
एफडीएने सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्याचा थेट फटका ग्रामीण भागातल्या गोरगरीब कष्टकरी आणि मोल मजुरी करणाऱ्या नागरिकांना बसला आहे, सुट्टं तेल विकत घेण्यासाठी तेल विक्रेत्याकडे आलेले गावातील अनेक नागरिक निराश झाले आहेत. मात्र बदनापूर शहरातल्या किराणा दुकानात सुट्टे खाद्यतेल मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत आहे. तर दुसरीकडे किराणा दुकानदारांना सुद्धा तुकाराम मुंढे यांच्या आदेशाची धास्ती असल्याचे चित्र राज्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. तुकाराम मुंडे यांनी आदेश दिल्यानंतर आम्ही सुट्ट्या खाद्य तेलाची विक्री बंद केली असल्याचे किराणा दुकानदार सांगत आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला पॅकिंगचे तेल घ्या असे आम्ही सांगत आहोत.
जळगाव-
हातावर पोट आहे, रोजंदारी करतो, पॅकिंगचे तेल घेऊ शकत नाही, सुटे तेल मिळणार नाही तर घरात आम्ही खायचे काय आणि कसे? सुटे तेल भेसळयुक्त असते आणि पॅकिंग तेल भेसळयुक्त नसते याची काय गॅरंटी, गरिबांचा पण विचार करा असे गावकरी म्हणत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या सुटे तेल विक्री बंदीच्या निर्णयावर जळगावमधील ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांनी उपस्थित केला आहे.
रोजंदारी मिळेल तसेच आम्ही जीवन जगतो पॅकिंग तेल घेण्याची आमच्यात कॅपॅसिटी नाही, मग त्याशिवाय खायचं कसं, राहायचं कसं, असं देखील महिलांनी म्हटलं आहे.पॅकिंगचे तेल घ्यायचं म्हटलं तरी भाव गगनाला भिडलेले आहेत. मग ते भाव कमी करा, कुठलाही निर्णय घेताना गरिबांचा विचार करा अशी विनंती देखील महिलांनी सरकारला केली आहे.
साखर,तेल सर्वच गोष्टींमध्ये महागाई वाढते आहे. मात्र रोजंदारी. मजुरी वाढत नाही त्याकडे देखील सरकारने लक्ष दिले पाहिजे.. असं मत देखील महिलांनी व्यक्त केले आहे. तेलातील भेसळ रोखण्याच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी सुटे तेल विक्री बंदी जाहीर केली आहे, या निर्णयावर जळगाव लगत परिसर तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत.