प्रयागराजला खोक्या सापडतो, पण कृष्णा आंधळे…, बजरंग सोनवणेंचा पोलिसांवर अचूक निशाणा

Krishna Aandhale : सतीश भोसले उर्फ खोक्या अवघ्या काही दिवसात प्रयागराजला सापडला. पण गेल्या चार महिन्यांपासून कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नसल्याबाबत बीडचे खासदर बजरंग सोनवणे यांनी पोलिसांना धारेवर धरले.

प्रयागराजला खोक्या सापडतो, पण कृष्णा आंधळे..., बजरंग सोनवणेंचा पोलिसांवर अचूक निशाणा
बजरंग सोनवणे यांचा प्रहार
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 27, 2025 | 11:50 AM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या होऊन चार महिने लोटले. याप्रकरणातील तीन आरोपींनी त्यांचे अपहरण आणि खून केल्याची कबुली दिली. सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी कोठडीत हा कबुलीजबाब दिला. पण याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. गेल्या चार महिन्यांपासून तो यंत्रणेला गुंगारा देण्यात यशस्वी झाला आहे. त्यावरून खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड पोलिसांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

देर है लेकीन अंधेर नही

हे प्रकरण जेंव्हा घडलं तेंव्हाच मी सांगितलं होतं की संतोष देशमुख हत्येमागे कट आहे. खंडणी मागितल्यावर केज मध्ये वाल्मिकी कराड सीसीटीव्हीत दिसले होते. कबुली जबाबात आरोपींनी सांगितलं की मारले आहे. पोलिसांसमोर ही कबुली येण्यासाठी आज १०५ दिवस लागले. देर है लेकीन अंधेर नही, अशी प्रतिक्रिया बजरंग बाप्पा यांनी दिली.

पोलिसांना सहआरोपी करा

या प्रकरणाचा शेवट संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांन फाशी देऊन करावी. ज्यांनी पैसे दिले गाड्या दिल्या त्यांना सहआरोपी केले पाहीजे. काही पोलिस सुद्धा यात आहे. पोलिसांना सहआरोपी केले पाहिजे. सीआयडी, एसआयटीची माझी मागणी मान्य करेल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर चांगलेच तोंडसुख घेतले.

कृष्णा आंधळेवरून साधला निशाणा

खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांवर चांगलाच निशाणा साधला. कृष्णा आंधळेवरून त्यांनी पोलिसांना सुनावले. आरोपी पळवाट काढतोय यात पोलीसांचे अपयश म्हणायला पाहिजे का? असा सवाल त्यांनी केला. प्रयागराजला खोक्या पकडला पण कृष्णा आंधळे का सापडला नाही. हे पोलीसांचे अपयश आहे, असा आरोप त्यांनी केला.

वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हत्याकांड

आज फक्त जवाब समोर आला आहे. वाल्मिकच्या सांगण्यावरून मारलं आहे. सुदर्शन घुले हा म्होरक्या आहे. जो पर्यंत सर्व गुन्हेगार पकडले जात नाही तो पर्यंत आम्ही सोडणार नाही. तपास यंत्रणा आणि कायद्यावर विश्वास ठेवला पाहीजे. वाल्मिक कराड पैसे गोळा करत होता. तो पैसे कोणा कोणाला देत होता ते तपासायला पाहीजे. त्याची २ हजार कोटींची संपत्ती आहे. स्वतः च्या अकाऊ्टवरून पैसे जात होते. त्यात काही नेते अधिकारी पण होते. त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे.

वाल्मिक दोन पत्नींना पैसे देत होता. खोक्याचं घर पाडलं गेलं. पण कराडची संपत्ती सील केली का ? गाड्या पकडल्या पण गाड्यांना कव्हर लावून ठेवले. त्याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली गेली. ज्या ज्या लोकांनी यात सहभाग घेतला त्यांची पार्श्वभूमी तपासायला पाहिजे. वाल्मिक कराडच्या सर्वच कंपन्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. कराड निगरगट्ट आहेत. जे लोकं सरेंडर होण्यासाठी प्रयत्न करत होते. वाल्मिक कराडला वाचविण्यासाठी इतरांना अडकवण्याचं काम सुरू होते. पण नियती कधी ना कधी समोर येते. नियतीने हे साध्य केलंय, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिली.