मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून (Rajyasabha Election) कोण लढणार? हा सस्पेन्स काही वेळापूर्वीच संजय राऊतांनी संजय पवारांचं (Sanjay Pawar) नाव जाहीर करत संपवला. मात्र संभाजीराजे यांचे (Sambhajiraje) शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर दाखल होत संभाजीराजे यांनी पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र सेनेकडून लढण्याची ऑफर संभाजीराजेंना शिवसेनेकडून देण्यात आली. तसेच शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी निमंत्रणही धाडण्यात आलं. त्यासाठी शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने संभाजीराजे यांची मुंबईतल्या हॉटेलवर दाखल होत भेट घेतली. मात्र तरीही संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम राहिले. त्यानंतर शिवसेनेकडून आज संजय पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र काही दिवसांपूर्वीच्या भेटीनंतर संभाजीराजे हे तातडीने कोल्हापूरला निघून गेले होते. शिवसेनेच्या घोषणेनंतर आता संभाजीराजे पुन्हा मुंबईत दाखल झाले आहेत. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुन्हा भेट घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेने संजय पवार यांची उमेदवारी जाहीर केल्यावर आता मराठा संघटनांनी शिवसेनेवर टीकेची झोड उडवली आहे. तसेच काही मराठा संघटना संभाजीराजे यांची मुंबईत भेट घेणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. संभाजीराजे यांनी जरी तुर्तास आपण कुणाची भेट घेणार नसल्याचे सांगितले असले, तरी संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मन वळवण्यात आणि शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यात राजे यशस्वी होणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली, असली तरी शिवसेनेची अधिकृत भूमिका लवकरच जाहीर होईल असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे हे राजेंवर दबावतंत्र आहे का असाही सवाल विचारण्यात येत आहे. त्यामुळे आगामी दिवसात राजे आपल्या अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहणार की शिवसेनेकडून लढणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. भाजपकडून मात्र राजेंना पाठिंबा देण्यासाठी अपक्ष लढण्याची अट घालण्यात आल्याच्याही राजकीय चर्चा आहेत.
शिवसेनेची अधिकृतपणे भूमिका जाहीर होत नाही तोपर्यंत आपण काही बोलणार नाही. मात्र सेनेने अधिकृतपण भूमिका जाहीर केल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर करेल असेही राजे म्हणाले आहेत. त्यामुळे सेनेची अधिकृत भूमिका कधी जाहीर होईल, याकडे राजकीय नजरा लागल्या आहेत. तर सेनेने आपली भूमिका न बदलल्यास राजे काय पाऊल उचलणार हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.