
राज्यात काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. राज्यात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या, तर भाजपनंतर या महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला यश मिळालं आहे. शिवसेना शिंदे गट महापालिका निवडणुकीत क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे. तिसऱ्या क्रमाकांवर काँग्रेस आहे. मात्र दुसरीकडे या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा दणका बसला आहे. मुंबई आणि इतर काही एक दोन महापालिका वगळता इतर ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाहीये. मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटानं महापालिका निवडणुकीसाठी मनसे सोबत युती केली होती.
दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या काही उमेदवारांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली होती, त्याचा मोठा फायदा हा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना झाला होता. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले. दरम्यान आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे, या निवडणुकीमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माघार घेत असल्याचं पहायला मिळत आहे.
कणकवलीमधून मोठी बातमी समोर आली आहे. कणकवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाकडून शिवसेना ठाकरे गटाला सलग दुसऱ्या दिवशी धक्का देण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या खारेपाटण जिल्हा परिषदेच्या उमेदवार मीनल तळगावकरांची माघार घेतली आहे. मीनल तळगावकर यांनी माघार घेतल्यामुळे आता खारेपाटण गटातून भाजपाच्या प्राची इस्वलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.
तर दुसरीकडे कणकवली तालुक्यामध्ये भाजपा पाठोपाठ शिवसेना शिंदे गटानं देखील उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटानं आपलं बिनविरोध निवडीचं खातं उघडलं आहे. कणकवली तालुक्यातील जाणवली जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार रुहिता तांबे यांची बिनविरोध निवड झाली आहे, त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या हेलन कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र ऐनवेळी त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रुहिता तांबे या विजयी झाल्या आहेत.