उद्धव ठाकरे सूर्याजी पिसाळाची औलाद… भाजप आमदाराची जीभ घसरली

ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरणे निर्माण झाली आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे सूर्याजी पिसाळाची औलाद... भाजप आमदाराची जीभ घसरली
| Updated on: Jul 07, 2025 | 8:32 AM

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आल्याची. तब्बल २० वर्षांनी अवघ्या महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण शनिवारी ६ जुलैला संपूर्ण राज्याने पाहिला. मुंबईतील वरळी डोम सभागृहात ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. यानिमित्ताने संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र एका मंचावर आले. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना मिठी मारत नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाली. या कार्यक्रमात मनसे नेते अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेही एकत्र आलेले दिसून आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख अनाजीपंत असा केला. त्यावर प्रत्युत्तर देताना भाजप आमदाराची जीभ घसरली आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना अनाजीपंत असा उल्लेख केला होता. कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आमच्या भाषणांकडे आहे. पण आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्यात जो काही आंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्या टीकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिले. ते सांगलीतील जतमध्ये बोलत होते.

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. “उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत”, अशा शब्दात पडळकरांनी टीका केली.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

“उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे. 2019 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याचे बहुमत दिले होते. पण उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती करत केली. हे सूर्याजी पिसाळासारखे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. देवेंद्र फडणवीस हे या महाराष्ट्रातील गोर गरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलले याला काडीचे महत्त्व नाही”, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली.

“२०१९ ला त्यांनी फडणवीसांचा घात केला. महाराष्ट्रातील जनतेने भरघोस मतदान महायुतीचे भरघोस आमदार दिले. उद्धव ठाकरेंकडून दिव्याच्या गाड्या, प्रोटोकॉल, झेड प्लस सुरक्षा सर्व गेलं आहे. काहीही राहिलं नाही? कोणी येतंय का? आता मातोश्रीवर आणि उध्दव ठाकरेंना भेटायला कोण जात नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे. सध्या सर्व गर्दी ही भाजपकडे, एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त बनले आहेत”, अशी टीका देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.