गणेश सोळंकी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, बुलढाणा | 28 नोव्हेंबर 2023 : शेतकरी प्रश्नांसाठी बुलढाण्यात आंदोलन सुरु आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग केला आहे. त्यांच्या या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. सोयाबीन , कापूस प्रश्नासाठी रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलन करत आहेत. चिखली तालुक्यातील सोमठाणा गावात आंदोलन सुरू आहे. अन्नत्याग आंदोलनाने तुपकर यांची तब्येत खालावली आहे. काही वेळाआधी त्यांची तपासणी करण्यात आली. तब्येत खालावत असतानाही तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण जीव द्यायलाही तयार असल्याचं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय.
रक्ताचे पाट वाहिले तरी चालेल. मात्र मी आंदोलनावर ठाम आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात. कापूस सोयाबीनसाठी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा. डॉक्टरांनी मला दवाखान्यामध्ये भरती होण्याचा सल्ला दिला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या साठी मी जीव द्यायला तयार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे. प्रशासनाला आमचं आंदोलन दुर्लक्षित करायचं आहे. मात्र आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तोवर आम्ही मागे हटणार नाही, असं म्हणत रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत.
माझ्या अन्नत्याग आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. गावागावातून लोक भेटायला येत आहेत आणि या आंदोलनाला समर्थन देत आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड प्रेम आणि पाठिंबा या आंदोलनाला मिळत आहे. आज मोठ्या प्रमाणात शेतकरी माझ्यासोबत मुंबईकडे निघणार आहेत. गेल्या 3 दिवसांपासून पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाही. त्यामुळे थोडा अशक्तपणा जाणवत आहे. शरिरातील साखरेचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र सोयाबीन-कापूस उत्पादकांची लढाई थांबणार नाही. आता ही आरपारची झाली आहे. या लढाईत जीव देण्याचीही माझी तयारी आहे, असं रविकांत तुपकर म्हणालेत.
रविकांत तुपकर हे बुलढाण्यात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर हे थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. उद्या हे शेतकऱ्यांचं वादळ मुंबईत दाखल होईल आणि मंत्रालयाला घेराव घालेन, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे साबाबत प्रशासन काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.