इकडे अश्रूंचा महापूर, तिकडे चोरांची हातसफाई; बारामतीत अजितदादांच्या अंत्यविधीवेळी संतापजनक प्रकार

अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असताना बारामतीत धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे; या घटनेने बारामतीकरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

इकडे अश्रूंचा महापूर, तिकडे चोरांची हातसफाई; बारामतीत अजितदादांच्या अंत्यविधीवेळी संतापजनक प्रकार
ajit pawar
| Updated on: Feb 02, 2026 | 9:48 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असताना दुसरीकडे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ केला आहे. अजित पवारांचे अंत्यविधी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडले. या अंत्यविधीवेळी चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घालत तब्बल १५ जणांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्या. चोरीला गेलेल्या या दागिन्यांची किंमत सुमारे २५ ते ३० लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. यानंतर २९ जानेवारीला अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय बारामतीत दाखल झाला होता. याच प्रचंड गर्दीचा गैरफायदा काही सराईत चोरट्यांनी घेतला. यावेळी नागरिक अत्यंत भावनिक आणि शोकाकुल असताना चोरट्यांनी अत्यंत धाडसीपणे १५ नागरिकांना लक्ष्य केले.

विशेष म्हणजे अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात सुमारे ८ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात असतानाही चोरट्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर डल्ला मारल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, गर्दीतून काही संशयितांना नागरिकांनी सतर्कता दाखवत रंगेहाथ पकडले आणि त्यांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

पाच जणांवर गुन्हे दाखल, तपास सुरू

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित नागरिकांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी मोहम्मद युनूस, राजकुमार आठवले, एजाज मिरावले, मोहम्मद सिराज आणि बाळू बोत्रे यांच्यासह अन्य दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या आरोपींची कसून चौकशी करत असून, यामागे आंतरराज्यीय टोळीचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे संपूर्ण बारामती अजितदादांच्या अकाली जाण्याने अश्रू ढाळत असताना, अशा संवेदनशील प्रसंगी घडलेल्या या चोरीच्या घटनांनी सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावेळी चोरी गेलेला ऐवज परत मिळावा आणि मुख्य सूत्रधारांना अटक व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.