महिला डॉक्टर प्रकरणात फडणवीसांचं मोठं विधान, निंबाळकरांचं नाव घेत थेट सांगून टाकलं; म्हणाले थोडा जरी…

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलिसाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे पीडितेला न्याय देण्याचे आश्वासन दिले.

महिला डॉक्टर प्रकरणात फडणवीसांचं मोठं विधान, निंबाळकरांचं नाव घेत थेट सांगून टाकलं; म्हणाले थोडा जरी...
| Updated on: Oct 26, 2025 | 3:41 PM

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर यात आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर या दोघांना अटक करण्यात आली असून, त्ंयाच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप केले जात आहेत. आता या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साताऱ्यातील फलटण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येबद्दल भाष्य केले. परवा आमची एक लहान बहिण जी डॉक्टर होती, ज्यांचा अतिशय दुर्दैवीपणे मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली. ही आत्महत्या करताना त्याचे कारणही आपल्या हातावर लिहून ठेवले. पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्यांना अटकही केली. त्यातलं सर्व सत्य हे बाहेर येत आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा देखील निर्णय घेतला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राजकीय भूमिका कोणी घेत असेल तर तेही मी सहन करणार नाही

अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टी राजकारण घुसवायचं, अशाप्रकारचा निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. काहीही कारण नसताना रणजित दादा, सचिन दादाचं नाव यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. एवढीशी जरी शंका असती, तर मी हा कार्यक्रम रद्द करुन मी या ठिकाणी आलो नसतो. अशा गोष्टीत मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही आणि राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या लहान बहिणीचा विषय आहेत, तिथे मी काहीच तडजोड करत नाही. पण त्याचवेळी प्रेताच्या टाळूवरचं लोणी कोणी खात असेल आणि प्रत्येक गोष्टीत जर राजकीय भूमिका कोणी घेत असेल तर तेही मी सहन करणार नाही. त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे, हे देखील तुम्ही समजून घ्या, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

पण आता जिल्हा मागू नका

काही लोकांनी पश्चिम महाराष्ट्रचे नाव घेत सगळे काम आपल्याकडे वळवायचे कामं केले. रणजितदादाच्या डोळ्यात पाणी आले पण खचून जाऊ नका. फलटणला सगळ्या गोष्टी दिल्यात पण आता जिल्हा मागू नका. आता आपल्याला नवा संघर्ष नको आहे. रणजितदादाच्या मागण्या मारुतीच्या शेपटीसारख्या आहेत, त्या कधी संपत नाहीत. पण या मागण्या संपू नयेत. कारण जो खरा लोकनेता असतो तो कायम विकासासाठी आग्रही असतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.