उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत फोन केला अन् म्हणाले… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय?
हे सरकार घरात बसणारं नाही. फेसबुक लाइव्ह करणारं नाही. उंटावरून शेळ्या हाकणारं सरकार नाही. फेस टू फेस काम करणारं सरकार आहे. काम करणाऱ्या सरकारच्या मागे जनता उभी राहील. घरी बसणाऱ्यांच्या नाही. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन लोकांमध्ये जात आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील बंडावेळी नेमकं काय घडलं होतं याचा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना आमदार सुरतला गेल्यावर शिवसेनेत धांदल उडाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीत फोन लावला. दिल्लीतील भाजप नेत्यांशी संवाद साधला. यांना कशाला घेता? आम्हीच तुमच्यासोबत येतो, अशी ऑफरच उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना दिली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्सक्ल्युझिव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंडावेळच्या परिस्थितीवर भाष्य केलं. आम्ही बोलत बोलत गेलो. आम्ही लपूनछपून गेलो नाही. जाहीरपणे गेलो. परत बोलवायचं आणि आमचे पुतळे जाळायचे. पक्षातून हकालपट्टी करायची. दिल्लीत भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा करायची. यांना कशाला घेताय आम्हीच येतो तुमच्यासोबत, असं सांगायचं. असा प्रकार त्यावेळी घडला होता, असं सांगतानाच शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं ते थांबवण्यासाठी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं. पाऊल टोकाचं आणि धाडसाचं होतं. त्याला हिंमत लागते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यांनी युती तोडली, आम्ही पूर्ण केली
भाजपसोबत आमची वैचारिक युती होती. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि मुंडे यांच्या प्रयत्नाने ही युती झाली. ती युती आम्ही पुन्हा केली. यांनी तोडली होती. त्यांनी जी चूक केली ती आम्ही दुरुस्त केली, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
मला मोह नाही
मी साधा सरळ माणूस आहे. मला सत्ता आणि पैशाचा मोह नाही. पैशाचा मोह कुणाला? खोक्याचा मोह कुणाला? हे जनता जाणते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचंच नव्हतं ना. ते म्हणत होते की, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे. शिवसैनिकाला पालखीत बसवायचं आहे. पण जेव्हा स्वत:चा स्वार्थ जागृत होतो, तेव्हा शिवसैनिकांची किंमत नसते. मला पदाची आणि सत्तेची हाव नव्हती. मला संधी मिळाली. त्याचं मी सोनं करतोय, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले