Maharashtra Lockdown Update | ‘मुख्यमंत्री काही दिवस परिस्थिती पाहतील, नंतर लॉकडाऊनवर निर्णय’; मंत्र्याचे मोठे वक्तव्य

| Updated on: Apr 17, 2021 | 11:10 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही दिवस परिस्थिती पाहतील. त्यानंतर लॉकडाऊनबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे परब यांनी म्हटलंय. (uddhav thackeray corona lockdown anil parab)

Maharashtra Lockdown Update | मुख्यमंत्री काही दिवस परिस्थिती पाहतील, नंतर लॉकडाऊनवर निर्णय; मंत्र्याचे मोठे वक्तव्य
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ होत असल्यामुळे राज्यात सध्या चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे काही दिवस परिस्थिती पाहतील. त्यानंतर लॉकडाऊनबाबत योग्य तो निर्णय घेतील, असं परब यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू होणार का ?, असा प्रश्न विचारला जातोय. अनिल परब (Anil Parab) मुंबईत बोलत होते. (CM Uddhav Thackeray will see Corona situation and will take appropriate decision on lockdown in Maharashtra says minister Anil Parab)

“सध्या राज्यातील बसेस राज्याच्या बाहेर जात नाहीयेत. तसेच बाहेरच्या बसेस राज्यात येत नाहीयेत. तरीही परिस्थिती पाहून निर्णय़ घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे इतर ठिकाणाहून ऑक्सिजन मागवला जातोय. या वाहतुकीकडे परिवहन खातं पूर्ण लक्ष ठेवून आहे. लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री काही दिवस परिस्थिती पाहतील. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील,” असे अनिल परब म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्रयत्न

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्यात एसटी कर्मचारी अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. यामध्ये आतापर्यंत अनेक बसचालक आणि बसवाहकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचे लसीकरण कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती परब यांनी दिली. “एसटी कर्मचाऱ्यांचं लसीकरण व्हावं यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई काम करणाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण होणं गरजेचं आहे. जे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत; त्याची दाखल घेण्यात आली आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मदतीचा हात कसा देता येईल तसेच त्यांना संसर्ग कसा होणार नाही याबाबत आम्ही नक्की उपायोजना करणार,” असे परब म्हणाले.

कुंभमेळ्यावरुन आलेल्यांना विलगीकरणात ठेवणार

देशभरात कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. उत्तर प्रदेशमधील कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने साधू, लोकांनी गर्दी केली आहे. कुंभमेळ्यात चाचणी केल्यानंतर हजारो लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याहून परतणाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितलंय. “कुंभमेळा होतोय. आशा ठिकाणी कोरोना संसर्ग वाढत आहे. कुंभमेळ्यामध्ये मोठा संसर्ग झालाय. येथील लोक सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी खबरदारी घेणे महत्वाचे आहे. कुंभमेळ्याहून परतणाऱ्या लोकांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. तशा सूचना नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत,” असे परब यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आगामी काही दिवसांत परिस्थिती बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्था तोकडी पडत असल्याचेसुद्धा दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आगामी काही दिवस परिस्थिती पहतील आणि लॉकडाऊबाबत योग्य निर्णय घेतील, या परब यांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे. सध्या संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : सांगली जिल्ह्यात दिवसभरात 962 नवे कोरोनाबाधित, तर 14 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू

कोरोनाची तिसरी लाट, मृत्यू दर ते हवेतील संसर्गाचा धोका, आयसीएमआरच्या माजी संचालकांकडून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Maharashtra Corona Update : हाहा:कार ! राज्यात कोरोनाचे तब्बल 67 हजार 123 नवे रुग्ण, मृतांचा आकडाही 400 पार