फेरीवाल्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक, कोरोना रिपोर्ट दाखवल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही, वर्ध्यात प्रशासनाची अट

| Updated on: Feb 25, 2021 | 5:13 PM

वर्ध्यात प्रशासनाने आता शहरात फिरणारे फेरीवाले आणि हॉकर्स यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे (Covid test compulsion for hawkers in Wardha).

फेरीवाल्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक, कोरोना रिपोर्ट दाखवल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही, वर्ध्यात प्रशासनाची अट
कोरोना चाचणी प्रातिनिधिक फोटो
Follow us on

वर्धा : वर्धा शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने आता शहरात फिरणारे फेरीवाले आणि हॉकर्स यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. वर्धा नगरपालिकेच्या वतीने शहरात फेरीवाल्यांच्या चाचणीसाठी दोन कॅम्प लावण्यात आले आहेत. या कॅम्पला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. एवढंच नव्हे तर आता वर्धा शहरात कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्र असल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही (Covid test compulsion for hawkers in Wardha).

वर्धा नगर पालिकेच्यावतीने वर्धा शहराच्या बालाजी मंदिर परिसरात आणि जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील हॉकर्स प्लाजा येथे अँटीजन चाचणी कॅम्प लावण्यात आले आहे. सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळपर्यंत हे कॅम्प सुरू ठेवण्यात आले आहे. मागील दोन दिवसात या कॅम्पला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालिका प्रशासनाने शहरात सेवा देणाऱ्या हॉकर्स यांची चाचणी करत स्वत: सुरक्षित राहावे आणि शहरातील नागरिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वर्ध्यात कोरोनाचा कहर

राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केलीय. राज्याच्या विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढायला लागली आहे. विशेष म्हणजे राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा वर्धा जिल्ह्यात कोरोनाचे फारसे रुग्ण नव्हते. मात्र, आता वर्धा जिल्ह्याला कोरोनाचा मोठा फटका बसताना दिसत आहेत. वर्ध्यात बुधवारी (24 फेब्रुवारी) दिवसभरात तब्बल 192 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे चिंता वाढली आहे. सध्या वर्धा जिल्ह्यात 834 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

प्रशासन सतर्क, जमावबंदी, संध्याकाळी सात नंतर दुकाने बंद

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. वर्धा जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. याशिवाय संध्याकाळी सात वाजेनंतर सर्व दुकानं बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्याचबरोबर लग्न समारंभामध्ये फक्त 50 जणांना परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिराऱ्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे लग्न समारंभाची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावी, अशीदेखील अट आहे. कोणतीही रॅल, मिरवणूक काढण्यास सध्या परवानगी नाही (Covid test compulsion for hawkers in Wardha).

हेही वाचा : नाशकात भाजप-मनसे युती निश्चित, राज्याच्या राजकारणातही कित्ता गिरवणार?