
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (Film City) यांच्या अंतर्गत साकारण्यात येत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पहिल्या फीचर फिल्म ‘खंजिरीचे बोल’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप आज मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला. या चित्रपटाचा मुहूर्त सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडताच चित्रपटाच्या शूटिंगलाही अधिकृत सुरुवात झाली. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच कोल्हापूर येथे सुरू होणार आहे.
एकेकाळी समाज प्रबोधन, ग्रामविकास, राष्ट्रभक्ती आणि भक्तीचा संदेश देण्यासाठी कीर्तन हे प्रभावी माध्यम मानले जात होते. संतांच्या कीर्तनातून समाजाला सकारात्मक दिशा मिळत असे. मात्र आधुनिक काळात ही परंपरा हळूहळू मागे पडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारा, कार्यपद्धती आणि समाजासाठी केलेले कार्य व्यापक स्तरावर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि समाजप्रबोधनाची परंपरा महाराष्ट्रासह देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
या चित्रपटात लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद ओक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन करत असून लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण हिमांशु दुबे यांचे असून संगीत कौशल इनामदार यांनी दिले आहे. तर चित्रपटाचे कला दिग्दर्शक संतोष फुटाणे आहेत.
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्म सिटी) निर्मित, इन असोसिएशन विथ कल्चर कॅनव्हास एंटरटेनमेंट प्रोडक्शन च्या सहयोगाने हा चित्रपट निर्मित करण्यात येत आहे. या चित्रपटाची सह-निर्मिती शिवम यादव आणि कार्तिकी यादव यांनी केली असून, हा चित्रपट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे. त्यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा, कीर्तन परंपरेचा आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून दिलेल्या विचारांचा प्रभावी पट या चित्रपटातून उलगडला जाणार आहे.
यावेळी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय अॅड. आशिष शेलार म्हणाले की, ‘महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमधून मानवी मूल्ये, राष्ट्रभक्ती, महान व्यक्तिमत्त्वे आणि त्यांच्या कार्यावर आधारित चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘खंजिरीचे बोल’ हा चित्रपट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित असून त्यांच्या ग्रामसेवा, परोपकार आणि भक्तीमार्गाच्या विचारांना समाजापर्यंत पोहोचवण्याचे मोठे माध्यम ठरेल. अनंत महादेवन यांचे दिग्दर्शन आणि प्रसाद ओक यांचा प्रभावी अभिनय यामुळे हा विषय अधिक ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असा मला विश्वास आहे. या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा.’