Malegaon Blast Case : ‘हिंदू सहिष्णू’, मालेगावच्या निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Malegaon blast case verdict : तब्बल 17 वर्षांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला आहे. या निकालावर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी भगवा दहशतवाद असा शब्द वापरला गेलेला.

Malegaon Blast Case : हिंदू सहिष्णू, मालेगावच्या निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 31, 2025 | 1:05 PM

“सर्वप्रथम मी न्यायालयाच्या निर्णयाच स्वागत करतो. उशिरा का होईना या लोकांना न्याय मिळाला आहे. कारण त्या काळात यूपीएच सरकार होतं त्यावेळेस मुंबईसह देशभरात बॉम्बस्फोट सुरु होते. हजारो निरपराध लोकांचे बळी जात होते. त्यावेळी या यूपीए सरकारचे लोक बोलायचे, दहशतवादाला कुठला रंग नसतो. पण मालेगाव बॉम्बस्फोटानंतर त्यांनी भगवा दहशतवाद म्हटलं. भगवा आतंकवाद म्हणाले” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगाव बॉम्ब स्फोटाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले.

“भगव्याला बदनाम करण्याचं काम, हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम काँग्रेस यूपीए सरकारने केलं. त्यांना आजच्या निकालाने न्यायालयाने सणसणीत चपराक लगावली आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले. राजकीय नेत्यांनी वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “घटना घडली त्यावेळी भगवा दहशतवाद हा शब्द कोणी आणला? त्यावेळच्या सरकारने आणला. त्यावेळी देशभरात बॉम्बस्फोट सुरु होते. लक्ष विचलित करण्यासाठी हा भगवा दहशतवाद शब्द आणला”.

हिंदू सहिष्णू आहे

“हिंदू सहिष्णू आहे. त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. तो देशविघातक कृत्य करत नाही हे आजच्या निकालावरुन स्पष्ट झालय. न्याय उशिरा मिळाला. त्यांना न केलेल्या कृत्याची शिक्षा भोगावी लागली” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही’

“सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात कथित आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, पण सत्य कधीही पराजित होत नसतं, हे पुन्हा एकवार सिध्द झालंय. मालेगावच्या स्फोटांप्रकरणी खोटे आरोप करुन तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता. कारण आपली बाजू न्यायाची आहे, याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आदी सात जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदेंनी काय लिहिलय?

“हिंदू कधीही देशविरोधी कृत्यं करु शकत नाही, कारण देशभक्ती हे हिंदूधर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं. ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी चलनात आणला. याच्यासारखा धादांत त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे? एक काळंकुट्ट पर्व आज संपलंय. हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला गेलाय. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल, यात शंका नाही”
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं!