‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेलचा राज्यभर विस्तार, राज्यातील सर्व शाळा-कॉलेजमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती स्थापन होणार
Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती'ची स्थापना होणार आहे.

मुंबई, दि. 28 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात अमली पदार्थांविरुद्ध एक मोठा लढा उभारण्यात आला आहे. याच लढ्याला महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अधिक बळ मिळत आहे. ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचे मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती’ची स्थापना होणार आहे. माझ्या निवेदनाची दखल घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानतो,” असे नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी सातत्याने जनजागृती केली जाईल. विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल वेळेत ओळखून त्यांना आवश्यक समुपदेशन उपलब्ध करून देणे, पालक व शिक्षकांमध्ये समन्वय साधणे तसेच गरज भासल्यास संबंधित तज्ज्ञांकडे मार्गदर्शनासाठी संदर्भित करण्याची जबाबदारीही या समित्यांवर असेल.
केंद्र शासनाने 2029 पर्यंत देश अमली पदार्थमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून अमली पदार्थांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई आणि व्यापक जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनानेही राज्यात व्यसनमुक्तीची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
30 जुलै रोजी वरळी डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ होत आहे. हा केवळ उद्घाटनाचा कार्यक्रम नसून वर्षभर चालणारी जनचळवळ आहे. या अभियानामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वर्षभर विविध जनजागृतीपर उपक्रम, मार्गदर्शन सत्रे, समुपदेशन कार्यक्रम तसेच व्यसनमुक्तीविषयी संवादात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
व्यसनमुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या या लोकचळवळीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था तसेच सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.