Video | राजकारण जाईल चुलीत, पण इथलं गव्हर्नन्स ठीक रहावं, आता त्यालाच बट्टा लागतोय; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
राजकारण जाईल चुलीत. मात्र, इथलं गव्हर्नन्स ठीक राहिलं पाहिजे, पण त्याला बट्टा लागतोय, असं म्हणत शनिवारी, 26 मार्च रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते शिर्डी विमानतळावर आले असता बोलत होते. येणाऱ्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. नेमकी त्यापूर्वीच ही आरोप-प्रत्यारोपांची राळ सुरूय.

शिर्डीः राजकारण जाईल चुलीत. मात्र, इथलं गव्हर्नन्स ठीक राहिलं पाहिजे, पण त्याला बट्टा लागतोय, असं म्हणत शनिवारी, 26 मार्च रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते शिर्डी विमानतळावर आले असता बोलत होते. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलेला उभ्या महाराष्ट्राने पाहिला. मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवर झालेल्या प्रत्येक आरोपाचे सडेतोड उत्तर दिले. कोविड घोटाळ्याच्या आरोपापासून ते नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यापर्यंत त्यांनी रोखठोक भूमिका मांडत विरोधकांना जोरदार फटकारेही लगावले. त्यांनी थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या अभिभाषणापासूनच सुरुवात करत कोपरखळ्या, टोले, चिमटे काढत विरोधकांना उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेच होते, पण आता त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.
अशी अवस्था कधीच नव्हती…
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस म्हणाले की, या संदर्भात सगळ्यांनीच विचार करण्याची आवश्यकता आहे. पण त्या राजकारणापेक्षाही मला चिंता महाराष्ट्राचीय. महाराष्ट्रामध्ये नो गव्हर्नन्स ही जी अवस्था पाहायला मिळतीय, ही अवस्था महाराष्ट्राने कधीही पाहिली नव्हती.
महाराष्ट्र ठीक रहायला पाहिजे…
फडवीस पुढे म्हणाले की, राजकारण जाईल चुलीत. महाराष्ट्र ठीक रहायला पाहिजे. इथले गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे. महाराष्ट्राच जे नावलौकीक आहे, ते ठीक राहिले पाहिजे. कुठे तरी त्याला बट्टा लागतो हा प्रॉब्लेमय, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. आता यावर शिवसेनेकडून स्वतः पुन्हा मुख्यमंत्री उत्तर देणार की आणखी कोणी, हे पाहावे लागेल.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर…
मुख्यमंत्री विधानसभेत बोलल्यानंतर त्यानंतर फडणवीसांनी जोरदार उत्तर दिले होते. ते म्हणाले होते, मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली नाहीत. युक्रेनने नाटो ऐवजी मुख्यमंत्री ठाकरेंकडे मदत मागायला हवी होती. कारण त्यांच्याकडे टोमणे बॉम्ब आहे. तुमच्या घरगड्यांना ईडीने बोलवल्यावर तुम्ही ईडीला घरगडी म्हणताय. असा टोलाही त्यांनी लगावला होता. येणाऱ्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. नेमकी त्यापूर्वीच ही आरोप-प्रत्यारोपांची राळ सुरूय.