मुंबई : कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 हजार 200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमधील प्रमुख बसस्थानकातून 4 सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहेत. चाकरमान्यांना थेट त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. तर 14 सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. 16 जुलै 2021 पासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरु होईल, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे. (2200 buses of ST Corporation for passengers going to Konkan for Ganpati Utsav)
गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती आणि कोकणचा चाकरमानी यांचं एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या #गणपती उत्सवासाठी #एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस ४ सप्टेंबरपासून सुटणार असून त्याच्या आरक्षणाला १६ जुलैपासून सुरुवात होणार आहे- परिवहन मंत्री @advanilparab यांची माहिती pic.twitter.com/3ZSrszJrnV
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 14, 2021
एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार सुमारे 2 हजार 200 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असं अनिल परब यांनी सांगितलं. गणेशोत्सवासाठी 4 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील. तर 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी 16 जुलै 2021 पासून आरक्षणाला सुरुवात होणार आहे. चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचंही एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक आणि बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती, परब यांनी दिलीय.
संबंधित बातम्या :
2200 buses of ST Corporation for passengers going to Konkan for Ganpati Utsav