
इराणवर इस्राईल-US यांनी युद्ध लादल्याने इंधन आणि व्यापार ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे. इराणने अनेक अरब देशातील रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांना टार्गेट केल्याने आणि होर्मुज स्ट्रेट हा समुद्र मार्गावर अडचणी उभ्या केल्याने इंधनाचे मोठे संकट जगावर निर्माण झाले आहे. यामुळे भारतातही गॅस पुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. तर व्यावसायिक गॅस वापरावर मर्यादा आली आहे. आता राज्यातील या गॅस टंचाईचा सामना उद्योगधंद्यांना करावा लागत आहे. संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
गॅस टंचाईचा मोठा फटका उद्योगांना बसत आहे, संभाजीनगरातील ५ मोठे उद्योग बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक क्षेत्राला गॅस टंचाईची झळ बसली आहे.व्यावसायिक वापराच्या गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने अनेक उद्योग अडचणीत सापडले असून तब्बल पाच मोठे उद्योग बंद करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे.ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्या आणि स्टील उद्योगांवर याचा सर्वाधिक परिणाम होत आहे. उद्योगांना आवश्यक असलेला गॅस न मिळाल्याने उत्पादन प्रक्रिया ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जर अशीच गॅस टंचाई कायम राहिली तर त्यामुळे उद्या आणखी काही उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.संभाजीनगर औद्योगिक क्षेत्राला दररोज सुमारे २५० ते ३०० मेट्रिक टन गॅसची गरज असते.मात्र सध्या गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने उद्योगांमध्ये मोठे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, सीएमआयए (Chamber of Marathwada Industries and Agriculture) या उद्योग संघटनेने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत मुख्यमंत्री यांना पत्र पाठवले आहे. तातडीने गॅस पुरवठा सुरू करून उद्योगांना मदत करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
अमेरिका इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जळगाव जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर आधारित छोटे छोटे उद्योग संकटात सापडलेले असून व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद झाला तर उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. जळगावच्या एमआयडीसीतील चिक्की आणि गुळाचे लाडू बनवणाऱ्या कंपनीमध्ये दररोज 15 ते 20 व्यावसायिक सिलींडर लागतात. सध्या तरी व्यावसायिक सिलेंडरचा कंपनीकडून पुरवठा केला जात असल्याने समस्या नाही. मात्र, पुढच्या काळात व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा झाला तर उद्योग पूर्णपणे ठप्प होण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे. उद्योग जर बंद पडले तर परिणामी कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार देखील बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.