कांदा उत्पादकांचा संताप पाहून सरकार ॲक्शन मोडमध्ये, गिरीश महाजनांनी दिली मोठी अपडेट, थेट दिल्लीत…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी उद्या नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

राज्यात सध्या कांदा दराचा प्रश्न कमालीचा पेटला आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. नाशिकच्या चांदवड येथे महाविकासआघाडीतील नेत्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी क्रांती मोर्चा काढला. या मोर्चानंतर आता राज्य सरकार देखील ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी अपडेट दिली आहे. कांद्याचा विषय खरा असून शेतकरी अडचणीत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी उद्या नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
चांदवड आंदोलनावर गिरीश महाजन काय म्हणाले?
नाशिकच्या चांदवड येथे आमदार रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ आणि शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज कांदा उत्पादकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनावर आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी सविस्तर भाष्य केले.
कांद्याचा विषय नक्कीच गंभीर आहे, हे नाकारता येणार नाही. कांद्याचे भाव कमी असल्याने आमचा बळीराजा सध्या अडचणीत सापडला आहे. चांदवड येथे जे आंदोलन सुरू आहे, त्यातील काही आंदोलने ही राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मात्र, तरीही आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अत्यंत संवेदनशील आहोत. याप्रकरणी आम्ही सातत्याने केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत. तसेच यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.
उद्या दिल्लीत महाबैठक
तसेच कांद्याच्या घसरलेल्या दरांवरून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत नवी दिल्लीत एक हायव्होल्टेज बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अमित शाह यांच्यासमोर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व मुद्दे, हमीभाव आणि अनुदानाचा विषय मांडले जाणार आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, जयकुमार रावळ यांसह इतर २ महत्त्वाचे मंत्रीही या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल. या उच्चस्तरीय बैठकीतून सकारात्मक चर्चा होऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नक्कीच ठोस तोडगा निघेल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
प्रमुख मागण्या काय?
शेतकऱ्यांच्या मते, कांदा उत्पादनासाठी प्रति किलो १८ ते २० रुपये खर्च येतो. मात्र, सध्या बाजारपेठेत केवळ १२ ते १५ रुपये प्रति किलो दर दिला जात असल्याने शेतकरी मोठ्या तोट्यात आहेत. तसेच शासकीय पातळीवर कांद्याची ३,००० रुपये प्रति क्विंटल (किंवा किमान २४ रुपये प्रति किलो) या दराने खरेदी करण्यात यावी, जेणेकरून उत्पादन खर्च वजा होऊन शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे शिल्लक राहतील. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कमी दरात कांदा विक्री केली आहे, त्या विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल १,५०० रुपये अनुदान देण्यात यावे, या मागण्यांसाठी चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले.