आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी द्या, व्यापाऱ्यांना आवाहन करत काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर

| Updated on: Sep 27, 2021 | 1:18 PM

केंद्र सरकारने गेल्या वर्षी पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात आज काँग्रेससह सर्वच समविचारी पक्षांनी भारत बंद आंदोलनाची हाक दिली आहे. जळगावात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला.

आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी द्या, व्यापाऱ्यांना आवाहन करत काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर
जळगावात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
Follow us on

जळगाव : केंद्र सरकारने गेल्या वर्षी पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात आज काँग्रेससह सर्वच समविचारी पक्षांनी भारत बंद आंदोलनाची हाक दिली आहे. जळगावात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला. सकाळ सत्रात बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाल्याने बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवत नव्हता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी व्यापाऱ्यांना सक्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन सुरू आहे. देशभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. परंतु, केंद्र सरकारने या आंदोलनाची अद्यापही दखल घेतलेली नाही. या बाबीचा निषेध नोंदवण्यासह दिल्लीतील आंदोलनाला पाठबळ म्हणून आज काँग्रेससह देशभरातील समविचारी पक्षांनी एकत्र येत देशव्यापी भारत बंदची हाक दिली आहे. याच अनुषंगाने आज जळगावातही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर समविचारी पक्षांनी भारत बंद पाळला जात आहे.

बाजारपेठ सुरु, नेते उतरले रस्त्यावर

आज देशव्यापी भारत बंद आंदोलन असताना जळगावात मात्र सकाळपासूनच बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाली होती. त्यामुळे बंद यशस्वी होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. शहरातील बाजारपेठेचा मुख्य भाग असलेल्या महात्मा फुले मार्केट, टॉवर चौक, गोलाणी मार्केट, नवी पेठ भागात फिरून दोन्ही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.

एक दिवस शेतकऱ्यांसाठी द्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. दरम्यान, काही व्यापारी दुकाने बंद करत नसल्याने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. व्यापारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

केरळपासून दिल्लीपर्यंत, रस्ते बंद, रेल्वे ट्रॅक जाम!

दुसरीकडे राजधानी नवी दिल्लीसह पंजाब, हरियाणामध्ये भारत बंदला मोठा उस्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. अनेक राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग देखील बंद आहेत. अनेक ठिकाणी चक्काजाम करण्यात आलं. गाजीपूर, सिंघु बॉर्डवर देखील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.

राज्यातील शेतकरी संघटना आणि काही पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे बाजार समित्या, शहरातील मुख्य मार्केट यावर परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. काँग्रेस पक्षानेही आंदोलनाला पाठिंबा दिला असून स्थानिक पातळीवरही पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

हे ही वाचा :

दिल्ली ते केरळ शेतकरी रस्त्यावर, रस्ते बंद, रेल्वे ट्रॅक जाम, गाजीपूर बॉर्डरवर शेतकरी जमले