‘घोटाळेबाजांची टोळी जमलीय’, जुने दाखले देत चित्रा वाघ यांचा कुणावर निशाणा?

मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ यांनी मोठी टीका केली आहे. हे सगळे घोटाळेबाज आहेत आणि या सर्वांची कॉंग्रेसला गरज आहे. याचे कारण देताना त्या म्हणाल्या....

घोटाळेबाजांची टोळी जमलीय, जुने दाखले देत चित्रा वाघ यांचा कुणावर निशाणा?
CHITRA WAGH ON INDIA MEETING
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar | Updated on: Aug 31, 2023 | 5:38 PM

मुंबई : 31 ऑगस्ट 2023 | देशातील 28 प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची मोठ बांधली आहे. दिल्ली आणि बंगळूर येथील दोन बैठकानंतर आता मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक होत आहे. शिवसेना ( उद्धव ठाकरे ) या बैठकीचे आयोजक आहेत. या बैठकीची शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. तर, भाजप नेत्यांनी इंडियाच्या बैठकीवर टीका केली. त्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही उडी घेतली आहे. इंडिया बैठक ही घोटाळेबाजांची टोळी असल्याची घणाघाती टीका भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व घोटाळेबाज एकवटले आहेत. एकीकडे प्रामाणिकपणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात हा घोटाळेबाजांचा गट आहे. 2024 मध्ये जनता त्यांना धडा शिकवेल, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

‘उद्धव ठाकरे यांना चारा घोटाळेबाज लालूप्रसाद यादव यांची गरज आहे. लालू प्रसाद यादव यांना कोविड घोटाळेबाज उद्धव ठाकरे यांची गरज भासते. केजरीवाल यांना चिटफंड घोटाळेबाज ममता बॅनर्जीची गरज आहे. ममता बॅनर्जींना दारू घोटाळेबाज केजरीवाल यांची गरज आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांचा सम्राट असलेल्या काँग्रेसला या सर्व घोटाळेबाजांची गरज आहे’, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

‘इंडिया आघाडी ही सर्व घोटाळेबाजांची टोळी आहे. त्या घोटाळेबाजांचे उद्योग जनतेला माहित आहेत. देशात ईमानदारीने काम करणारे पंतप्रधान आहेत. तर, दुसरीकडे घोटाळेबाजांची टोळी जमली आहे. ये पब्लिक है सब जानती है’, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

हा बाँब निकामी आहे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘इंडिया बॉम्बचे बारुद कधीच निघाले आहे. हा बाँब निकामी आहे, त्यांचे अनके नेते दुरावले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह गेला आहे, देशात दिसले पाहिजे म्हणून ते बैठका घेत आहे, यांच्यामागे जनता नाही’, असा टोला लगावला आहे.

डब्यात राहणारे लोक

‘जे पक्ष या बैठकीसाठी आले आहेत. त्यातील अनके पक्षांकडे एक मतही नाही, हा प्रयोग काही नवीन नाही, यापूर्वीही असे प्रयोग झाले आहेत. त्यांचा कुणी संयोजक नाही. शरद पवार काय किंवा अन्य कुणीही संयोजक झाले तरी काही होणार नाही. ते ह्या डबक्यात कुदतील आणि त्या डब्यात राहतील. हे डब्यात राहणारे लोक आहेत. ते देशव्यापी काहीच करू शकणार नाही’, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

Follow Us