मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंस वाटतं पण…, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मोठं विधान केलं आहे, मला राजकारणातून रिटायर्ड व्हावं वाटतं असं विधान त्यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे. मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मला राजकारणातून रिटायरर्ड व्हावं वाटतं, परंतु जनतेचा उत्साह पाहून नव्याने उभारी मिळते असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांचं देखील कौतुक केलं आहे. मोदी देशाच्या विकासाचे आणि भविष्याचे फ्रेन्ड आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
परळी महामार्गाच्या दुरावस्थेवर भाष्य करताना राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक वक्तव्य केले आहे. “या रस्त्यावर खडकत-खडकत आले आणि पीएला म्हटलं, आता कंटाळा आलाय. राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं,” असे त्या म्हणाल्या. मात्र, सभास्थळी उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहिल्यानंतर आपल्याला नव्याने प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. “ही लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, तर तुमचा विकास करण्यासाठी आहे,” असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मोदींच्या कामाचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीबाबत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलेला एक भावनिक अनुभव सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. दिल्लीतील भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतील हा अनुभव त्यांनी एका व्हिडिओद्वारे मांडला आहे. पंकजा मुंडे सांगतात की, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी त्या दोन ते तीन दिवस दिल्लीत होत्या. बैठकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा अधिकृत दौरा पूर्ण करून थेट बैठकीला पोहोचले.
प्रवासाचा थकवा न जाणवू देता त्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेतला. स्थानिक प्रश्न, संघटनात्मक बाबी आणि विकासकामांवर त्यांनी सखोल चर्चा केली. विशेष म्हणजे ही बैठक तब्बल साडेआठ तास चालली. या काळात केवळ दोन वेळा चहा आणि एकदा कॉफीसाठी अल्प विश्रांती घेण्यात आली. उर्वरित वेळ पंतप्रधान प्रत्येक विषयात बारकाईने लक्ष घालून चर्चा करत होते, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. या अनुभवातून सर्वाधिक जाणवलेली गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदी यांची राष्ट्राशी असलेली भावनिक बांधिलकी. ज्यांना स्वतःचा परिवार नाही, त्यांनी या देशालाच आपला परिवार मानले आहे असे त्या यावेळी म्हणाल्या.