
महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर झालेल्या जनसुरक्षा विधेयकाला महाविकास आघाडी विरोध करत आहे. या जनसुरक्षा विधेयकाला अर्बन नक्षलवादाशी जोडलं जात आहे. अर्बन नक्षलवाद रोखण्यासाठी जनसुरक्षा विधेयक आणल्याची चर्चा आहे. आज उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत याच विधेयकाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी राज्य सरकारला कोंडीत पकडणारा प्रश्न विचारला. “काल जनसुरक्षा विधेयक आणलं. त्यावर चर्चा झाली. त्या चर्चेतून काही निघालं का? त्यातून काही घेणार आहात का? घेणार असालं तर मी बोलतो. सर्व काही तुम्ही पाशवी बहुमतावर रेटून नेत असाल तर बोलून काय फायदा? मी बाहेर बोलतो ते चांगलं आहे ना” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“या बिलाने महिलांवरील अत्याचार थांबणार आहे का?. चोऱ्या माऱ्या थांबणार आहे का? मी बिल वाचलं. त्याची सुरुवात आहे कडव्या डाव्या विचारसरणीचा. मुळात डावी विचारसरणी म्हणजे काय? उजवी काय? डावी विचारसरणी सामाजिक न्याय, व्यक्ती स्वातंत्र्य, समानता भाषण स्वातंत्र्य , उजव्या विचारसरणीत धर्माधिष्ठता आणि भांडवलशाही येते” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पहलगाममधील अतिरेक्यांना कडव्या उजव्या विचाराचे म्हणून सोडून देणार का?
“म्हणजे डाव्या विचारसणीत काही चांगल्या तर उजव्या विचारसरणीत आहे. यातील चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. कडवी डावी, मग कडवी उजवी नाही का? जर का उजवी विचारसरणी ही धर्मावर आधारीत असेल. पहलगाममधील अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. म्हणजे कडव्या उजव्या विचाराचे म्हणून त्यांना सोडून देणार आहात का?दहशतवादी, देशविघटनकारी शक्तीविरोधात आपण लढत आलो आहोत. नक्षलवाद किंवा दहशतवाद संपवण्यासाठी आमचा पाठिंबा आहे” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
‘यांच्यात ती ही हिंमत नाही’
“गेल्या आठ दहा दिवसापूर्वी भाजपने देशभर ५० वा दिवस केला. या लोकांनी आणीबाणीला विरोध केला होता. आता हीच लोकं आहेत ज्यांनी अघोषित आणीबाणी आणली आहे. ज्या गोष्टीला तेव्हा त्यांनी विरोध केला तीच गोष्टी ते आणत आहे. निदान इंदिरा गांधींनी उघड केलं होतं. यांच्यात ती ही हिंमत नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘हा कायदा तुम्ही आता आणताय’
“नक्षलवाद संपत आला असेल तर कायदा का आणता. ६४ नावे आहेत तर जाहीर करा आणि त्यांच्यावर बंदी घाला. आम्ही कुठे काय म्हणतो. नक्षलवाद तुम्ही संपवलं. पोलीस अधिकारी तिथे ड्युटी करून रिटायर झाले असतील. किंवा त्यांचे बलिदान झाले असतील. नागरिकांनीही शौर्याने मुकाबला केला. हा कायदा तुम्ही आता आणताय. शौर्य गाजवून त्यांनी नक्षलवाद संपुष्टात आणला आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.