मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
MPSC Paper Canceled
Image Credit source: Google
| Updated on: Aug 25, 2026 | 11:40 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेत पेपरफुटीचे आरोप झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या आरोपांमुळे गेल्या काही काळापासून या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर MPSCच्या अनेक विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. विद्यार्थ्यांकडून सातत्याने आवाज उठवण्यात येत होता. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

MPSC कडून परीक्षा रद्द

अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेपरफुटीच्या आरोपांमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही नाराजीचे वातावरण होते. अखेर आयोगाने या संपूर्ण भरती प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेत ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या मागणीला यश

औषध निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी आणि गैरप्रकारांची चौकशी व्हावी, अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी केली होती. पेपरफुटीच्या आरोपांनंतर विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी केली होती. आयोगाच्या या निर्णयामुळे आता संबंधित पदाची भरती प्रक्रिया नव्याने कशा पद्धतीने राबवली जाणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. नवीन भरती प्रक्रिया आणि परीक्षेबाबत आयोगाकडून पुढील काळात अधिकृत माहिती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन या संवर्गासाठी 29 जुलै, 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर 22 मार्च 2026 रोजीच्या चाळणी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याबाबत आयोगाला तक्रारी मिळाल्या होत्या. यात परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका आणि प्रश्न मिळाले होते अशी माहिती तक्रारीत देण्यात आली होती. त्यानंतर 27 जुलै, 2026 रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होता. काही दिवसांनी पोलिसांनी आयोगाला अहवाल सादर केला होता. त्यानंतर आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Follow Us