दोन दुर्घटना घडल्या, तिघांचा मृत्यू, पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं… जालन्यावर शोककळा

जालना जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातांमध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 2 जण गंभीर जखमी आहेत. जालना-अंबड महामार्गावर कार-ट्रक धडकेत जाफराबादच्या 2 मित्रांनी जीव गमावला, तर बदनापूरमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनांमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

दोन दुर्घटना घडल्या, तिघांचा मृत्यू, पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं... जालन्यावर शोककळा
जालना अपघात
| Updated on: Jun 29, 2026 | 10:05 AM

एकाच दिवसांत अपघातांच्या दोन घटनांमध्ये 3 हसत्या खेळत्या लोकांचा जीव घेतला असून त्यामुळे जालना अक्षरश: हादरलं आहे. जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताने खळबळ माजली. कार -ट्रकच्या धडकेत दोन जिवलग मित्रांनी जीव गमावला.तर एक जण गंभीर जखमी झाला. आणि दुसऱ्या ठिकाणी दुचाकीच्या धडकेत एका तरूणाचा मृत्यू झाला. पोलीस भरतीची तयारी करणारा हा तरूण मृत्यमुखी पडल्या असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. तिघांच्या मृत्यूमुळे जालन्यावर शोककळा पसरली आहे.

जिवलग मित्रांनी गमावला जीव

जालना अंबड महामार्गावर कार आणि ट्रकच्या धडकेमध्ये जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला, याच घटनेत आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. विकास चव्हाण आणि सागर बर्डे अशी मृत्यू झालेल्या दोन जिवलग मित्रांची नावे आहेत. त्यांच्या जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून, गावात शोककळा पसरली आहे.

तर दुसरीकडे बदनापूर तालुक्यातल्या अकोला गावातील पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण देवानंद गीते याचा देखील दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय. आई वडिलांचा एकुलत्या एक मुलगा असलेला देवानंद गीते याने पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगलं होतं. मात्र ते स्वप्न पूर्ण होण्यापूर्वी काळाने देवानंद याच्यावर घाला घातला.जिल्ह्यात घडलेल्या या दोन्ही अपघाताच्या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नागपुरात मेट्रो स्टेशन लगत दुकानात घुसली कार

दरम्यान नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपुरात वासुदेव नगर मेट्रो स्टेशन लगतच्या पोहेवाला शॉपमध्ये कार घुसली. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास रोडच्या लगत असलेल्या दुकानाच्या शेडमध्ये भरधाव कार अचानक घुसली. कारचा वेग इतका अधिक होता की यामध्ये दुकानाच्या परिसरात असणाऱ्या लोखंडी साहित्य आणि पोलही वाकले. सुदैवाने मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे दुकानात कोणीही नव्हतं, त्यामुळे जीवितहानी झाली नाही अथवा कोणी जखमीही झालं नाही. मात्र या अपघातामध्ये दुकानाच मोठं नुकसान झालं.

कारच्या धडकेत पोहेवाल्याच्या दुकानाचं जवळपास अडीच लाखांच नुकसान झालं. मध्यरात्री शहरात उच्चभ्रू कुटुंबातील मुलं भरडा रेसिंग कार रस्त्यावर उतरतात आणि त्यामधून अशा पद्धतीची घटना घडत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही गाडी ही भरधाव रेसिंगच्या नादात तर कार घुसली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Follow Us