भाजपात जाऊन परत आलेल्यांना 2 वर्ष वेटिंगवर ठेवा!, राष्ट्रवादीतल्या इनकमिंगवर जितेंद्र आव्हाडांचं परखड मत

| Updated on: Feb 21, 2021 | 6:03 PM

सत्तेच्या सावलीत येण्याआधी त्यांना चटके सोसू द्या, कारण राष्ट्रवादी ही काही खानावळ नाही, असं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. (Jitendra Awhad NCP)

भाजपात जाऊन परत आलेल्यांना 2 वर्ष वेटिंगवर ठेवा!, राष्ट्रवादीतल्या इनकमिंगवर जितेंद्र आव्हाडांचं परखड मत
जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री
Follow us on

ठाणे: राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले जे कार्यकर्ते राष्ट्रवादीत परत येतील, त्यांना किमान 2 वर्ष वेटिंगवर ठेवा, असं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते. सत्तेच्या सावलीत येण्याआधी त्यांना चटके सोसू द्या, कारण राष्ट्रवादी ही काही खानावळ नाही, असं परखड मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आव्हाड बोलत होते. (Jitendra Awhad slams who quit NCP and now wished to join Party again)

कठिण काळात पक्षासोबत राहणाऱ्यांना प्राधान्य

2014 साली राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडून भाजपात गेले, ते आता राष्ट्रवादीत पुन्हा येण्यासाठी धडपड करतायत. काहींनी प्रवेशही केलाय. मात्र जे कार्यकर्ते कठीण काळात पक्षासोबत खंबीरपणे उभे होते, त्यांनाच पक्ष पहिलं प्राधान्य देईल, असं आव्हाड म्हणाले. कार्यकर्त्यांना पक्षात घ्या, पण त्यांना किमान दोन वर्ष कुठलंही पद देऊ नका. सत्तेच्या सावलीसाठी जे तिकडे गेले त्यांना आता परत सत्तेच्या सावलीत याचचं असेल, तर आधी चटके सोसू द्या. कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही काही खानावळ नाहीये, असं परखड मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. ही सत्ता आणण्यासाठी पवार साहेबांनी मोठे परिश्रम आणि त्याग सोसल्याचंही ते म्हणाले.

गणेश नाईक यांच्यावर बोचरी टीका

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईक यांच्यावरही जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता बोचरी टीका केली. पूर्वीचं जिल्ह्यातलं नेतृत्व आणि आत्ताचं नेतृत्व यांच्यात फरक आहे. आत्ताचं नेतृत्व कुणाच्याही घरी मटण भाकरी खायला जाणार नाही. जाईल तर आपल्याच कार्यकर्त्यांच्या घरी जाईल. त्यामुळं जिल्ह्यातलं जेवणाचं राजकारण बंद झाल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यातून त्यांनी गणेश नाईक यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा यानंतर रंगली होती.

सुप्रिया सुळेंचा नरेंद्र मोदींवर निशाणा

नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून एक कुटुंबप्रमुख आहेत. आपल्या घरातलं एखादं मूल जर नाराज असेल, तर त्याची समजूत काढण्याची जबाबदारी ही कुटुंबप्रमुखाची असते. मोदी संसदेत म्हणाले की मला एक फोन करा, मी शेतकऱ्यांशी बोलायला तयार आहे. पण आम्ही फोन लावून लावून थकलो, तरी आमचा फोन पंतप्रधान कार्यालयात कुणी घेत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच याउलट जर तुम्हीच एक फोन शेतकरी नेत्यांना केलात, तर ते तुमच्याशी बोलायला येणार नाहीत का? असा सवालही त्यांनी विचारला. मोदीजी भाषणात आणि मन की बात मध्ये खूप चांगलं आणि पटेल असं बोलतात, पण त्याची कृती होत नाही, याचं दुःख होतं, असं म्हणत गुलाम नबी आझाद रिटायर झाल्याचे अश्रू त्यांना आवरले नाहीत, पण आमच्या शेतकऱ्यांवर पाणी मारताना त्यांचे अश्रू दिसले नाहीत, त्यामुळे त्यांचे अश्रू नेमके कुणासाठी आहेत? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

संबंधित बातम्या:

ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं; जितेंद्र आव्हाडांची टीका

‘राष्ट्रवादीत असताना गणेश नाईकांना मान होता, पण भाजपच्या कार्यक्रमात बसायला खुर्चीही मिळत नाही’


(Jitendra Awhad slams who quit NCP and now wished to join Party again)