KDMC : उलटा न्याय, डॉग बाइट प्रकरणात डॉक्टरांना खरं बोलल्याची KDMC प्रशासनाने दिली शिक्षा

कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. मोठ्या संख्येने श्वानदंश झाल्याची डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमुळे KDMCने त्यांना नोटीस बजावली. यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, ते कुत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी आकडेवारीवर वाद घालणाऱ्या KDMCकडून ठोस उपाययोजनांची मागणी करत आहेत, कारण सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

KDMC : उलटा न्याय, डॉग बाइट प्रकरणात डॉक्टरांना खरं बोलल्याची KDMC प्रशासनाने दिली शिक्षा
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे दहशत
| Updated on: Aug 13, 2026 | 12:21 PM

कल्याण-डोंबिवली शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, प्रशासनाच्या कारवाईवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कल्याणच्या खडकपाडा परिसरात 9 ऑगस्ट रोजी एका भटक्या कुत्र्याने मोठ्या संख्येने नागरिकांना चावा घेतल्याची घटना समोर आली होती. तर दुसऱ्या दिवशी , सोमवारी रस्त्यावरील आणखी एक कुत्रा रेल्वे स्टेशन परिसरातही अनेकांना चावला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होतं, भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली. यानंतर रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉ. संदीप पगारे यांनी माध्यमांशी बोलताना 9 ऑगस्ट रोजी तब्बल 100 ते 130 नागरिकांना श्वानदंश झाल्याची माहिती दिली होती. या आकडेवारीमुळे खडकपाडा परिसरातील परिस्थितीचे गांभीर्य समोर आलं. मात्र, डॉ. पगारे यांनी दिलेली आकडेवारी चुकीची असल्याचा ठपका ठेवत केडीएमसीच्या वैद्यकीय विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे कुत्र्यांना पकडण्यासाठी काही उपाययोजना तर केल्या नाहीत, मात्र आकडेवारी सांगणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केल्याने KDMCच्या उफराट्या कारभारावर सवाल उपस्थित होत आहेत.

प्रशासनाच्या आकडेवारीत केवळ 58 रुग्ण

केडीएमसी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 9 ऑगस्ट रोजी श्वानदंशाच्या 58 प्रकरणांची नोंद झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी माध्यमांना दिलेली 100 ते 130 रुग्णांची माहिती आणि प्रशासनाच्या अधिकृत नोंदी यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आल्याचं म्हटलं आहे. आकडेवारीतील या फरकामुळे नेमकं किती नागरिकांना श्वानदंश झाला, याबाबत संभ्रम निर्माण झाला. डॉक्टरांनी रुग्णालयातील उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या आधारे आकडेवारी सांगितली होती की प्रशासनाच्या नोंदी वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आल्या, याबाबतही चर्चा सुरू झाली .

कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी डॉक्टरांवर कारवाई ?

खरंतर शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, प्रशासनाने मूळ समस्येवर ठोस उपाययोजना करणं अपेक्षित आहे. मात्र त्याऐवजी प्रशासनाकडून डॉक्टरांनाच नोटीस बजावण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्यामुळे श्वानदंशाच्या किती घटना घडल्या त्याची नोंद ठेवणं, त्यावर तातडीने उपाय करणं आणि भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, असं नागरिकांचं म्हणणं आहे.

शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचे टोळकं फिरत असून, विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना त्यांचा धोका असल्याची तक्रार वारंवार केली जाते. त्यामुळे केडीएमसीने केवळ आकडेवारीच्या वादात न अडकता श्वानदंशाच्या घटनांबद्दल पावलं उचलावीत आणि वेगाने उपाय करावेत अशही मागणी केली जात आहे.

इतर प्रकरणांतील कारवाईबाबतही सवाल

दरम्यान, केडीएमसीच्या आरोग्य व्यवस्थेशी संबंधित यापूर्वी चर्चेत आलेल्या काही प्रकरणांचाही मुद्दा आता उपस्थित केला जात आहे. इंजेक्शनची सुई मुलाच्या कमरेत अडकल्याचा प्रकार तसेच शास्त्रीनगर रुग्णालयातील प्रेग्नन्सी टेस्टच्या वादासारख्या प्रकरणांमध्ये अजूनही अपेक्षित ती कारवाई झालेली नाही, त्यावरूनही टीका करण्यात येत आहे. ‘खरे आकडे सांगितल्यामुळे डॉक्टरांना नोटीस; मात्र गंभीर त्रुटींवर मौन का?’ असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us