
मोठी बातमी समोर येत आहे, अखेर कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश आलं आहे, माधुरी हत्तीणीला लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये आणणार असल्याचं आश्वासन वनताराकडून देण्यात आलं आहे. वनताराचे सीईओ विहान करणी यांची आज नांदणी मठाच्या महंतांसबोत बैठक पार पडली, या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी माधुरी हत्तीणीला परत कोल्हापूरला आणणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नांदणी परिसरात माधुरीसाठी घर बांधणार असून, याच परिसरात माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करणार असल्याचं देखील विहान करणी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले वनताराचे सीईओ?
हा मुद्दा प्रतिष्ठेचा नाहीये तर हा मुद्दा माधुरीच्या जीवासंदर्भात आहे.यामध्ये हारण्याचा किंवा जिंकण्याचा प्रश्न नाहीये. यामध्ये माधुरीचा विजयच आहे. कारण वनतारामध्ये देखील तिला चांगलं घर मिळालं होतं, आणि इथे नांदणी मठात देखील तिला चांगलं घर मिळणार आहे, त्यामुळे माधुरीचा विजयच झाला आहे, आम्ही प्राणी वेअफेअरच्या बाजूनं उभे आहोत, त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या माधुरी लवकरात लवकर कोल्हापुरात येईल, असं विहान करणी यांनी म्हटलं आहे.
महंतांची प्रतिक्रिया
नांदणी मठ, महाराष्ट्र सरकार आणि वनतारा यांच्या संयुक्ताने सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे. नांदणी मठाच्या मालकिच्या जागेमध्ये हत्तीच्या पालपोलषणाची सुविधान केंद्र उभारणार असल्याचं वनतारा व्यवस्थापनाने मान्य केलं आहे, असं नांदणी मठाच्या महतांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे वनतारा व्यवस्थापनाकडून कोल्हापूरकरांची माफी देखील मागण्यात आली आहे. कोल्हापूरकर आणि जैन धर्मीय यांच्या भावना दुखवण्याचा कोणताही हेतू नव्हता असं वनतारा व्यवस्तापनाने म्हटलं आहे, त्याममुळे आता पुन्हा एकदा माधुरी हत्तीण वनतारामधून कोल्हापूरमध्ये दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वातावरण तापलं
दरम्यान माधुरी हत्तीणीला कोल्हापुरातून वनतारामध्ये नेण्यात आल्यानं कोल्हापूरमध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं. कोल्हापूरमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर अखेर वनतारा आणि नांदणी मठामध्ये आज बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये माधुरीला पुन्हा कोल्हापुरात आणण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.