काँग्रेसमध्ये मोठं काहीतरी घडतंय, नाना पटोले दिल्लीत, पडद्यामागील घडामोडी काय?

| Updated on: May 12, 2023 | 6:56 PM

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील इतर राजकीय घडामोडी पाहता महाराष्ट्र काँग्रेसमधील घडामोडी देखील तितक्यात महत्त्वाच्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज थेट दिल्लीत दाखल झाले. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय.

काँग्रेसमध्ये मोठं काहीतरी घडतंय, नाना पटोले दिल्लीत, पडद्यामागील घडामोडी काय?
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. नुकतंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. नाना पटोले यांनी कॅमेऱ्यासमोर विजय वडेट्टीवार यांना ते इतके मोठे नेते नाहीत की मी त्यांच्यावर इथे बोलावं, असं मोठं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनाही जिव्हारी लागलं. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी आपण योग्यवेळी उत्तर देऊ असं म्हटलं. महाराष्ट्र काँग्रेसमधील हे मतभेद आताचे नाहीत. काँग्रेसमधील अंतर्गत कलह सातत्याने उफाळून येतोय. असं असताना आज अचानक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत दाखल झाले.

नाना पटोले यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. पटोले यांनी सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, या विषयी पटोले यांनी स्वत: माहिती दिली. नाना पटोले यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधनीसाठी चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती दिली.

‘राहुल गांधी आणि प्रियंका गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार’

नाना पटोले यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नेमकी भेट का झाली, या विषयी सविस्तर माहिती दिली. लवकरच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबतही राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी रणनीती

“सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्याशी महाराष्ट्राचं राजकारण आणि पक्ष संघटनेवर चर्चा केली. येणाऱ्या कालावधीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी रणनीती आखली”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

“महाराष्ट्राच्या सत्तांतरावेळी तत्कालीन राज्यपालांची भूमिका चुकीची होती. भाजप संविधानिक व्यवस्थेला नष्ट करण्याचं काम करतंय. भाजपचा खरा चेहरा सुप्रीम कोर्टाने समोर आणला. सध्याचं सरकार असंविधानिक आहे. हे कोर्टाने सांगितलं. आम्ही पण तेच म्हणत होतो. भाजपमध्ये नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा. कोर्टाने स्पष्ट केलंय की सरकारचा पायाच चुकीचा आहे”, असं नाना पटोले म्हणाले.

अजित पवार यांच्या ‘त्या’ वक्तल्यावर नाना पटोले म्हणतात…

दरम्यान, नाना पटोले यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदावरुन राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर नाना पटोले यांनी उत्तर दिलं. “मी राहिलो असतो तर सरकार राहिलं असतं असं म्हणून मला हिरो बनवलं जात आहे. विलन नाही. मी शक्तिमान आहे, हे सांगण्याचा प्रयत्न अजितदादा यांच्याकडून सुरू आहे”, असं नाना पटोले म्हणाले.

“अजित पवार म्हणाले अध्यक्ष न नेमून आम्ही चूक केली, त्यांनी चूक मान्य केलीय. उपाध्यक्ष त्यांचेच होते. त्यांनी आमदारांवर कारवाई केली नाही. अजित पवारांनी असे वक्तव्य करण्याची गरज नव्हती”, अशी खंत नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केली.