राज्यात नवा वाद पेटला, सभागृहाला दिलेलं शिवरायांचं नाव बदललं; काँग्रेसचा भाजपवर जोरदार घणाघात
maharashtra Politics : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहाचं नाव बदलण्यात आलं आहे. यावरुन नवा वाद पेटला आहे.

राज्यात नवा वाद पेटला आहे. सोलापुरात जिल्हा परिषदेच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहाचं ‘शिवरत्न’ नाव हटवण्यात आलं आहे. या नावाऐवजी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह असे नाव देण्यात आलं आहे. या प्रकारामुळे राज्यभरात पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. आता चारीबाजूंनी भाजपच्या निर्णयावर टीका होऊ लागली आहे. भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे वावडे आहे का, असा आरोप सोशल मीडियावरून उपस्थित केला जात आहे. आता या वादात काँग्रेसने उडी मारली आहे.
काय आहे प्रकरण?
सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाचे ‘शिवरत्न’ नाव हटवून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह करण्याचा ठराव उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी मांडला. त्याला एकमताने मान्यता देण्यात आली. यामुळे जिल्ह्यासह राज्यात नवा वाद पेटला आहे.
जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाला 40 वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या कारकिर्दीत ‘शिवरत्न’ नाव दिले होते. काही वर्षांआधी जिल्हा परिषदेवर मोहिते पाटील समर्थकांची सत्ता होती. यंदा जिल्हा परिषदेत सत्ता बदल झाला. जिल्हा परिषदेवर भाजपने सत्ता काबीज केली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहाला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा ठराव झाला.
या ठरावानंतर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण जपण्याचे कार्य या निमित्ताने केले जात आहे, अशी भावना जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केली. परंतु या सभागृहाला दिलेले ‘शिवरत्न’ हे नाव कायम ठेवण्याची मागणी शरद पवार गटाने केली आहे. तर या वादात काँग्रेसनेही उडी घेतली आहे.
शिवरायांचे नाव हटवण्याची भाजपची हिंमत होतेच कशी?
सोलापूर जिल्हा परिषदेने शिवरायांच्या नावाने असलेल्या “शिवरत्न” सभागृहाचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
सत्ताधारी भाजपने तसेच हे कारस्थान ज्या नेत्याच्या डोक्यात शिजलं व भाजपचे जिल्हा परिषद…
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 6, 2026
काँग्रेसने ‘एक्स’वर पोस्ट करत काय म्हटलं?
काँग्रेसने म्हटलं की, ‘शिवरायांचं नाव हटवण्याची भाजपची हिंमत होतेच कशी? सोलापूर जिल्हा परिषदेने शिवरायांच्या नावानं असलेल्या “शिवरत्न” सभागृहाचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा निर्णय घेतलाय. सत्ताधारी भाजपने तसेच हे कारस्थान ज्या नेत्याच्या डोक्यात शिजलं. भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य या सर्वांनी आपल्या घरांचे, कार्यालयांचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी करावे. पण जिल्हा परिषद सभागृहाचे “शिवरत्न” हे नाव बदलू नये. महाराष्ट्राची जनता शिवछत्रपतींचा हा अपमान कदापी सहन करणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.