सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी खुशखबर! नवा GR आला, महागाई भत्त्यात वाढ, पगार होणार…
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे.

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे. जानेवारी ते जुलै 2026 दरम्यानचा महागाई भत्ता वाढीची थकबाकीही मिळणार आहे. वित्त विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महागाई भत्त्यात वाढ
राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. नवीन सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 58 टक्क्यांवरून 60 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. यामुळे सरकारी नोकरदारांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे.
ऑगस्टमध्ये DA ची थकबाकी मिळणार
राज्य सरकारने यासंदर्भात शासन आदेश जारी केला असून कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 ते जुलै 2026 या सात महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीची थकबाकीही मिळणार आहे. ही थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना थकित रक्कमही मिळणार आहे.
महागाई भत्ता देण्याची प्रक्रिया कायम
महागाई भत्त्याची रक्कम अदा करण्यासंदर्भातील सध्याच्या तरतुदी आणि कार्यपद्धती यापुढेही कायम राहणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागांना विद्यमान नियमांनुसारच वाढीव महागाई भत्त्याचे वितरण करावे लागणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महागाईच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, जानेवारीपासूनची सात महिन्यांची थकबाकी एकत्र मिळणार असल्याने त्यांच्या हातात ऑगस्टच्या वेतनासोबत अतिरिक्त रक्कम येणार आहे.
महागाई भत्ता काय आहे?
महागाई भत्ता म्हणजेच Dearness Allowance (DA) हा सरकारी कर्मचारी आणि काही पात्र कर्मचाऱ्यांना महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी दिला जाणारा अतिरिक्त भत्ता आहे. त्याची गणना सामान्यतः कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या ठराविक टक्केवारीनुसार केली जाते. आता राज्य सरकारने महागाई भत्ता 58% वरून 60% करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.