कोकण, पुणे अन् संभाजीनगरसाठी 150 कोटी…, राऊतांचा गंभीर आरोप; संजय शिरसाट म्हणाले तुम्ही वॉचमनगिरी…

विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज माघारीनंतर महाराष्ट्रात राजकारण कमालीचे तापले आहे. पुणे, कोकण आणि छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवारांच्या माघारीवरून संजय राऊत यांनी महायुतीवर १५० कोटींच्या घोडेबाजाराचा गंभीर आरोप केला आहे.

कोकण, पुणे अन् संभाजीनगरसाठी 150 कोटी..., राऊतांचा गंभीर आरोप; संजय शिरसाट म्हणाले तुम्ही वॉचमनगिरी...
sanjay raut sanjay shirsat
| Updated on: Jun 05, 2026 | 12:43 PM

राज्यात विधानपरिषद निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यातील विधानपरिषदेची अर्ज माघारी प्रक्रिया नुकतीच पार पडली. या प्रक्रियेनंतर पुणे, कोकण आणि छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवारांच्या माघारीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीवर तब्बल १५० कोटी रुपयांच्या घोडेबाजाराचा गंभीर आरोप केला आहे. तर, दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांचे हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. पराभव निश्चित दिसू लागल्यानेच हे बेछूट आरोप केले जात आहेत, असा पलटवार केला संजय शिरसाट यांनी आहे.

हा घोडेबाजार का केला जातोय?

संजयर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुती आणि भाजप सरकारवर पैशांचा पाऊस पाडल्याचा थेट आरोप केला. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील उमेदवारांची माघार बिनविरोध करण्यासाठी काल दिवसभरात १५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. कोकणातील उमेदवारी मागे घेण्यासाठी २५ कोटी रुपये देण्यात आले, ज्यातील १५ कोटी रुपये बीकेसीमधील एका हॉटेलमध्ये थेट सुपूर्द करण्यात आले. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही घडला आहे. एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काटकसर करण्याचे आवाहन करतात, मोठे कार्यक्रम टाळण्यास सांगतात; मग दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीत अशा प्रकारे कोटी कोटी रुपये उडवायला परवानगी दिली आहे का? तुमच्याकडे पुरेसे संख्याबळ असतानाही हा घोडेबाजार का केला जातोय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांच्या आरोपांना मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी जोरदार टोला लगावला. २५ कोटी रुपये म्हणजे काय पॉकेटमनी आहे का, जो असा खिशात टाकून घेऊन गेला? राऊतांना जर ही सर्व माहिती होती, तर ते तिथे काय वॉचमनगिरी करत होते का? त्यांनी पोलिसांना का कळवले नाही? असा सवाल संजय शिरसाट यांनी केला.

२५ कोटी रुपये म्हणजे काय पॉकेटमनी आहे का?

२५ कोटी रुपये म्हणजे काय पॉकेटमनी आहे का, जो खिशात टाकून घेऊन गेला? राऊतांना जर हे सर्व माहिती होते, तर ते तिथे काय वॉचमनगिरी करत होते का? त्यांनी पोलिसांना का कळवले नाही? महायुतीचे सर्व ६ उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट असल्याने राऊतांकडून कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्याचे काम सुरू आहे. विरोधकांमध्ये कधीही जागावाटपाबाबत एकत्र बैठक झाली नाही, त्यांच्याकडे आकडेच जुळत नसल्याने पराभव समोर दिसत आहे. त्यामुळेच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले की पैशांचे आरोप करायचे, हा त्यांचा धंदा झाला आहे, असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला.

Follow Us