Maharashtra News LIVE : हायकोर्ट परिक्षेत गोंधळ, अभिजीत दीपकेंकडून एक आठवड्याचा अल्टीमेटम
Maharashtra News LIVE Updates : पैश्याचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजेच्या तयारीत असलेल्या 15 जणांना लातूर जिल्ह्यातल्या उदगीर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे पैश्याचा पाऊस पाडण्यासाठी एका अल्पवयीन मुलीचा विधी दरम्यान बळी देण्यात येणार होता.

LIVE NEWS & UPDATES
-
नागपंचमीनिमित्त आज तुळजाभवानी मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर निर्बंध
नागपंचमीच्या सनातील विविध कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात आज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत पुरुषांना मंदिरात प्रवेश बंद राहणार आहे. नागपंचमीच्या दिवशी सुवासिनी महिलांकडून तुळजाभवानी मंदिरात नागपूजन, फेर-भुलई यांसह पारंपरिक विधी आणि खेळ खेळले जातात. याच पारंपरिक प्रथेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, भाविक आणि नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे.
-
सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ्यात न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी उत्साहात साजरी,,, यंदाही जिवंत नागांचे दर्शन.
जगप्रसिद्ध ओळख असणाऱ्या सांगलीच्या 32 शिराळ्याची नागपंचमी यंदाही न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे साजरी होत आहे. मात्र केंद्र सरकारकडून मिळालेल्या विशेष परवानगीमुळे शिराळकरांना नागपंचमी निमित्ताने जिवंत नागांचे दर्शन होत आहे.मात्र घरोघरी न्यायालयाच्या निर्देशानुसार नागांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचा पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात येत आहे.शेकडो वर्षांपासून शिराळा नगरीमध्ये जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा होती, मात्र न्यायालयाच्या निर्बंधामुळे,नाग पकडणे, मिरवणूक व जिवंत नागपूजेवर बंदी घालण्यात आली आहे.यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रतिकात्मक नागांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येत आहे.
-
-
साताऱ्यातील केसुर्डीत उघड्यावर टाकले बुरशीयुक्त चॉकलेट-बिस्कीट; लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ
सातारा: खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथे कचरा डेपोजवळ अज्ञातांनी मुदतबाह्य आणि बुरशी आलेले चॉकलेट्स व बिस्किटे उघड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही विषारी ठरू शकणारी बिस्किटे स्थानिक लहान मुले गोळा करून घरी घेऊन जात असताना ग्रामस्थांच्या नजरेस पडली. बुरशीयुक्त अन्नपदार्थांमुळे लहान मुलांना गंभीर विषबाधा होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने हा साठा तात्काळ जप्त करून उघड्यावर माल फेकणाऱ्या बेजबाबदार विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
-
सातारा:कळमगावात १०० फूट खोल विहिरीत पडलेल्या म्हशीला जीवदान; तरुणांचे थरारक बचावकार्य
सातारा: महाबळेश्वर तालुक्यात कळमगाव येथे कठडा नसलेल्या शंभर फूट खोल विहिरीत पडलेल्या म्हशीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. मुसळधार पावसात सह्याद्री ट्रेकर्स आणि स्थानिक जिगरबाज तरुणांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता हे कठीण बचावकार्य हाती घेतले. दोरखंड आणि जेसीबीच्या साहाय्याने अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर म्हशीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. तरुणांच्या या शौर्यामुळे मुक्या जीवाचे प्राण वाचल्याने सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने विहिरीला तातडीने कठडा बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
-
चेंबूरमध्ये शिवकन्या महिला गोविंदा पथकाच्या तरुणीची स्पेनसाठी निवड
चेंबूरमध्ये शिवकन्या महिला गोविंदा पथकाच्या तरुणीची स्पेनसाठी निवड झाली आहे. गेल्या १० वर्षांपासून पथकाचा दहीहंडी उत्सवात सक्रिय सहभाग आहे. यंदा नंदिनी शिंगेची स्पेनमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी निवड करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर दहीहंडी साजरी करण्याचा शिवकन्या पथकाचा संकल्प आहे. जवानांना सलामी देण्यासाठी सरकार व जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
-
-
नाशिक मुंबई महामार्गावर जिंदाल कंपनी जवळ दोन ट्रक चालकांमध्ये हाणामारी
नाशिक मुंबई महामार्गावर जिंदाल कंपनी जवळ दोन ट्रक चालकांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही ट्रक महामार्गावर थांबल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ट्रकच्या मागे असलेल्या वाहनचालकाने मारामारीचे दृश्य केले आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहे. आधीच खड्डे आणि महामार्गाच्या कामामुळे उशीर होत असलेल्या वाहनचालकांना आता या मारामारीच्या घटनेचा फटका बसला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
-
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटे पासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. राज्यभरासह देशभरातील भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा अभिषेक सुरू करण्यात आली आहे.
-
अर्धा ऑगस्ट संपलातरी वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची चिंता कायम
वाशिम : अर्धा ऑगस्ट संपलातरी वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची चिंता कायम आहे. वाशिम पाटबंधारे विभागाच्या ७७ प्रकल्पांत केवळ ३४.१९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांमध्ये अवघा २६.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम एकबुर्जी प्रकल्पात ३६.९३ टक्के तर सोनल प्रकल्पात केवळ १९.२१ टक्के साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ७५ लघु प्रकल्पांमध्ये ३५.०२ टक्के पाणी उपलब्ध. जिल्ह्यात दमदार पावसासाठी शेतकरी आणि नागरिकांची प्रतीक्षा कायम.
-
माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना अनेक ‘त्रुटी’
यवतमाळ : माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना अनेक त्रुटी निर्माण होत आहेत. खिडक्यांना जाळ्या नाही, स्वच्छतागृहांचे लाईट नाही. काहींना दरवेजे नाही…. चिंधुजी पुरके आदिवासी आश्रम शाळा मारेगाव येथे पुरेशी सुविधा नाही. 372 विद्यार्थी असलेल्या आश्रम शाळेत मुलांसाठी फक्त 15 बेड तर मुलींना अवघे 35 बेड आहेत, पुरेशा बेड अभावी अनेक विद्यार्थी खाली झोपतात. 133 विद्यार्थी गादी टाकून जमिनीवर झोपतात. आश्रम शाळेच्या खिडक्या ही नादुरुस्त असून शिवाय शाळेला नाही पूर्ण कंपाऊंड नाही. प्रकल्प कार्यालयाकडून शाळेची तपासणी करण्यात आली आहे.
-
पैश्याचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजेच्या तयारीत असलेल्या 15 जणांना लातूर येथून अटक
पैश्याचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजेच्या तयारीत असलेल्या 15 जणांना लातूर जिल्ह्यातल्या उदगीर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे पैश्याचा पाऊस पाडण्यासाठी एका अल्पवयीन मुलीचा विधी दरम्यान बळी देण्यात येणार होता अशी माहिती उघड झाली आहे. उदगीर ते लातूर रस्त्यावरच्या करडखेल पाटी जवळ वाहनांसह थांबलेल्या या 15 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत, आंध्रप्रदेशातून आणलेल्या पीडित मुलीची सोडवणूक केली आहे. पैश्याचा पाऊस पाडण्याच्या अघोरी पूजेत सहभागी असलेले आरोपी हे अकोला,परभणी,बीड,पुणे या शहरांसह कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील आहेत. आता या आरोपींची पोलिस लिंक शोधत आहेत.
-
ग्रामसभा आणि ग्रामपंचायत मध्ये झालेल्या कारभाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी टेंभुर्णी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण
जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या टेंभुर्णी येथील ग्रामपंचायतीत झालेल्या कारभाराची चौकशी आणि ग्रामसभा घेण्यात यावी या मागणीसाठी शुभम मुळे आणि त्यांच्या इतर काही सहकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासना विरोधात आमरण उपोषणाची हाक दिली. टेंभुर्णी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केलय. गावातील नागरिकांची प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडावे, शासकीय निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर करावा यासह इतर मागण्यांना घेऊन हे तरुण आमरण उपोषणाला बसले.
-
भीमाशंकर येथे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविकांनी भल्या पहाटेपासून भगवान शिवाच्या पिंडीचे दर्शन घेत आहेत. दरम्यान, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांमुळे मंदिर काही महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर मंदिराच्या दर्शनाची वेळ सकाळी 11 वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती.
-
नवनाथ वाघमारेने मराठा समाजाच्या मुली-महिला बद्दल केलं आक्षेपार्ह वक्तव्य
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेने मराठा समाजाच्या मुली-महिला बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा माढ्यात निषेध. सकल मराठा समाजाचे माढा पोलिस ठाण्यासमोर वाघमारेच्या विरोधात घोषणाबाजी. वाघमारेच्या वक्तव्याचा खरपूस समाचार. वाघमारेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या आग्रही मागणीसाठी माढ्यात मराठा समाज आक्रमक. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलनाचा मराठा समाजाकडून इशारा.
-
हायकोर्ट परीक्षेत गोंधळ, अभिजीत दीपकेंकडून एक आठवड्याचा अल्टीमेटम
परीक्षेत गडबड झाली होती. कुठे माउस काम करत नव्हते. कुठे कीबोर्ड काम करत नव्हते. आज विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. या आंदोलनाचं सगळ्यात मोठे यश आहे की कोर्टाने त्याची दखल घेतली आहे.आता सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवलं आहे की एक आठवडा रिक्वेस्ट अल्टिमेट देत आहोत. एका आठवड्यात काही निर्णय नाही आला किंवा काही बाकीच्या मागण्या होत्या. ऑफलाइन परीक्षा झाली पाहिजे, जितके गडबडीचे सेंटर आहेत ते ब्लॅक लिस्ट झाले पाहिजेत अशा मागण्या अभिजीत दीपके यांनी केल्या.
हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेवरुन काल मोठा गोंधळ झाला. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होते, काही ठिकाणी किबोर्ड खराब होता. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांनी या विरोधात छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या विविध भागात आंदोलन केलं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे सुद्धा या आंदोलनात उतरले. अखेर रात्री हायकोर्टाने या आंदोलनाची दखल घेत नोटीस जारी केली. अभिजीत दीपके यांनी सरकारला इशारा दिला आहे. आठवड्याभरात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेतला नाही तर तर संभाजीनगरातच आंदोलनाला बसू असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे. “परीक्षेत गडबड झाली होती. कुठे माऊस काम करत नव्हते, कुठे कीबोर्ड काम करत नव्हते. आज विद्यार्थी आंदोलनाला बसले होते, या आंदोलनाचं सगळ्यात मोठे यश आहे की कोर्टाने त्याची दखल घेतली आहे” असं दीपके म्हणाले.