ओसाड पाड्याचे नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांना महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा वनवासीपाडा आहे. या पाड्याची सन 1992 पूर्वीची परिस्थिती म्हणजे उजाड, ओसाड माळरान ,पिण्यासाठी घोटभर पाणी नाही, अशी होती. पण 1992 नंतर हे चित्र पालटलं आहे. गावात मोठया उमेदीने आणि दुर्दम्य आशावादाने चैत्राम पवार उभे राहिले.

ओसाड पाड्याचे नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांना महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर
चैत्राम पवार
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Feb 28, 2024 | 11:59 AM

धुळे : राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ (Maharashtra Vanbhushan Award) जाहीर करण्यात आला आहे.  धुळ्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 20 लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. ओसाड पाड्याचे नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांच्या कामाचा वन विभागाकडून गौरव आला आहे. चंद्रपूर येथे आयोजित ताडोबा महोत्सवात 3 मार्च रोजी हा पूरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चैत्राम पवार यांचे अभिनंदन केले आहे.

चैत्राम पवार यांचे योगदान का आहे महत्त्वाचे?

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा वनवासीपाडा आहे. या पाड्याची सन 1992 पूर्वीची परिस्थिती म्हणजे उजाड, ओसाड माळरान ,पिण्यासाठी घोटभर पाणी नाही, अशी होती. पण 1992 नंतर हे चित्र पालटलं आहे. गावात मोठया उमेदीने आणि दुर्दम्य आशावादाने चैत्राम पवार उभे राहिले. त्यांना गावातल्या आदिवासी मावळ्यांनी साथ दिली. या लोक चळवळीची दखल जगाने घेतली. जगातील 78 देशांमध्ये चांगले गाव कसे असावे? याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाडाने द्वितीय क्रमांक पटकावलाय. त्याचबरोबर बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा IFAD या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे. चैत्राम पवार आणि गावकऱ्यांच्या श्रमदानातून दैदिप्यमान बारीपाडा या आदिवासी पाड्याची यशोगाथा आहे. म्हणून चैत्राम पवार यांना महाराष्ट्राचा पहिला वनभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.