विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराचा रेट किती? वडेट्टीवारांनी सांगितला आकडाच; मोठी खळबळ
पुढील महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले आहे. या निवडणुकीत आतापासूनच 'नगरसेवक पळवापळवी'चा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विदर्भातील काही नगरसेवक नॉट रिचेबल असून,लाखो रुपये देऊन 'उचलले जात असल्याचा' वडेट्टीवार यांचा दावा आहे. यामुळे निवडणुकीत घोडेबाजार सुरू झाल्याने निष्पक्षता धोक्यात आल्याचे चित्र आहे.

राज्यात पुढील महिन्यात (22 जून ) विधान परिषदांच्या निवडणुका होणार असून त्यासाठी आजपासूनच उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली आहे. 1 जून पर्यंत अर्ज भरता येणार आहे. सत्ताधारी महायुतीचा जागावाटपचा फॉर्म्युला ठरल्यात जमा आहे तर महाविकास आघाडीमध्ये अद्याप चर्चा, बैठकांचं सत्र सुरू आहे. मात्र अशातच विदर्भात मोठी घडामोड घडल्याची चर्चा आहे. कोणता उमेदवार निवडणूक लढवणार हे निश्चित नसतानाच आता नगरसेवकांच्या पळवापळवीचे सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. पूर्वी विदर्भातील काँग्रेसचे नगरसेवक नॉट रिचेबल असून अनेक जण हे अज्ञातस्थळी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी थोड्याच वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. विधान परिषद निवडणूक, जागांची चर्चा, बैठाक, नगरसेवक, उमेदवारांची पळवापळवी, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले भाव यासह अनेक मुद्यांवर ते सविस्तर बोलले. 5-5 लाख देऊन नगरेसवक उचलले जात आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. 15-15 लाख रुपये देऊन एकेका मतासाठी निवडणुका होत असतील तर भविष्यात लोकशाही राहणा नाही, अशी टीकाही त्यांनी केली. वडेट्टीवार यांच्या या विधानाने मोठी खळबळ माजली आहे.
निवडणुकीत घोडेबाजाराचा रेट किती?
निवडणुका हा उत्सव झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक आमच्याही संपर्कात आहेत. त्यांच्याही अतंर्गत प्रचंड वाद आहेत. कोणीही डिसीजन घेतला तर दुसरा गट तयार आहेच आम्हाला मदत करायला. पण आम्ही त्या भानगडीत पडत नाही. जो घोडेबाजार चाललाा आहे, फोडाफोडीचा जो उत्सव चालला आहे. माझ्या माहितीप्रमाणे 5-5 लाख देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचं काम सुरू आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 2014 पासून जी सर्वांना ही सवय लावली आहे, त्यातून फेअर निवडणुका होणं, योग्य माणसाची निवड होणं हे राहिलेलं नाह, असंही ते म्हणाले. उद्योगपती, ठेकेदार, मोठमोठे कंत्राटदार हेच चेहर आता भविष्यात विधानपरिषदेत, विधानमंडळात दिसतील. सामान्य माणूस कुठेच दिसणार नाही, असंही चित्र भविष्यात पहायला मिळेल, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीविषयी वडेट्टीवार यांना सवाल विचारण्यात आला. ” अद्याप काहीही ठरलेलं नाही. जोपर्यंत आमच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होत नाही, तोपर्यंत मी यासंदर्भात काहीही निर्णय घेणार नाही. एकीकडे प्रचंड धनशक्ती आहे, मोठमोठे उमेदवार आहेत, जो काही आतात रेट खुलला गेला, तो 15 लाख रुपयांचा रेट उघडल्याची माहिती आमच्याकडे आहे. 15 लाख रुपये एका नगरसेवकाला दिल्यानंतर, उत्सवच झालाय, मोठी दिवाळीच झालीये, असं वाटेल ना. 15-15 लाख रुपये देऊन एकेका मतासाठी निवडणुका होत असतील तर भविष्यात लोकशाही शिल्लक राहील की नाही हा प्रश्नच असेल पुढे. ही 100 कोटींची निवडणूक आहे. ” अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी टीकास्त्र सोडलं.