Maharashtra Cold : महाराष्ट्र थंडीनं गारठला, नंदुरबारमध्ये पारा 5 अंशाच्या खाली; थंडीचा कडाका वाढणार

| Updated on: Jan 26, 2022 | 9:37 AM

राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. उत्तर भारतातील हवामानाची स्थिती आणि पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधून येणाऱ्या धुळीच्या वादळामुळं राज्यात थंडीचं (Cold Wave) वातावरण आहे.

Maharashtra Cold : महाराष्ट्र थंडीनं गारठला, नंदुरबारमध्ये पारा 5 अंशाच्या खाली; थंडीचा कडाका वाढणार
Mumbai Cold (Photo : ANI)
Follow us on

मुंबई: राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. उत्तर भारतातील हवामानाची स्थिती आणि पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधून येणाऱ्या धुळीच्या वादळामुळं राज्यात थंडीचं (Cold Wave) वातावरण आहे. मुंबई, (Mumbai) उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) आणि मराठवाड्यासह विदर्भात थंडीची लाट पसरलीय. मुंबईत आजही कडाक्याची थंडी अनुभवायला मिळतेय. मुंबईत पारा 16 अंशावर पोहोचला आहे. नाशिकच्या निफाडमध्ये पारा 4.5 वर पोहोचला आहे. तर, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी थंडीची लाट कायम आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात तापमान 5 अंश सेल्सिअस खाली आहे. त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. अकोला जिल्यात गेल्या तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा असून ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडी कमी झाली होती. हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यापर्यंत राज्यात थंडींचं वातावरण कायम राहणार आहे.

मुंबईत पारा 16 अंशावर

मुंबईत आजही कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली. मुंबईतील तापमानाचा पारा 16 अंशावर पोहोचला होता. मुंबईतील जेवाएलआर, विक्रोली परिसरात दाट धुक्यांची चादर पसरलेली पाहायला मिळाली. पश्चिम उपनगरातही आज हवेत प्रचंड गारवा जाणवत होता. त्याच बरोबर धुक्याची चादर ही पसरलीय. मुंबईचा पारा बऱ्यापैकी खाली आला असून आज तापमान 16 अंश नोद झालं आहे. येत्या 24 तास राज्यात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात थंडी आणि वेगवान वारे वाहणार असल्याचा अंदाज आहे. मुंबईत धुरकट वातावरण निर्माण झालंय. सकाळी दृष्यमानताही कमी झालेली दिसून आले.

नंदुरबार जिल्ह्यात थंडीची लाट कायम

नंदुरबार जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी थंडीची लाट कायम आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात तापमान 5 अंश सेल्सिअस खाली आहे. त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. सकाळी तोरणमाळ येथील पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसत असली तरी सकाळी 8 वाजे पर्यंत सर्व पाँईंट ओस पडलेले असतात. काल तोरणमाळ परिसरात दव बिंदू गारठल्याचे समोर आले होते. कडाक्याचा थंडीचा परिणाम दिसू लागला आहे. अनेक भागात दाट धुके होते ग्रामीण भागात नागरिकांनी थंडी पासून रक्षणासाठी शकोटी आणि उबदार कपड्यांची मदत घेतली आहे. अजून तीन ते पाच दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याच्या वतीने देण्यात आली आहे

अकोल्यात वातावरणात गारवा

अकोला जिल्यात गेल्या तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडी कमी झाली होती. पण, अचानक मध्यरात्री वातावरणात गारवा येऊन थंडी मध्ये वाढ होऊन गारठा ही खूप वाढला आहे.

निफाडमध्ये 4.5 अंश तापमनाची नोंद

नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही 4.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रातील हवामान विभागात या तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यात थंडीचा कडाका 8 फेब्रुवारीपर्यंत कायम

राज्यात थंडीचा कडाका 8 फेब्रुवारीपर्यंत कायम राहिल. 8 फेब्रुवारीनंतर थंडी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार आहे. पुण्यात पुढील तीन दिवसात थंडीचा जोर वाढणार आहे. 27 आणि 28 ला तापमानात आणखी घट होणार आहे. राज्यात येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे आणि पाकिस्तानातून आलेलं धूळीचं वादळ हे अरबी समुद्रावरून आल्यानं हवेत आद्रता जास्त आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कायम राहणार हवामानत तज्ञ मकरंद कुलकर्णी यांनी अंदाज वर्तवला आहे. वातावरणीय बदलामुळं मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि पुण्यात तापमान कमी झालंय.

इतर बातम्या

दुहेरी संकट : वाढत्या थंडीने द्राक्षांची फुगवण थांबली अन् तडाकण्याचा धोकाही वाढला

MPSC Exam : हायकोर्टाच्या आदेशानं 86 जणांसाठी प्रक्रिया जाहीर, इतर विद्यार्थीही आक्रमक, कपिल पाटील यांचे एमपीएससीला पत्र

Maharashtra Weather Cold Wave state witness low temperature in Nandurbar Akola and Mumbai