Manoj Jarange Patil : रेखा अंबुरे प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर केलेल्या आरोपांवर मोठा खुलासा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तिथे ते म्हणाले की, "मराठा समाजाला आरक्षण हाच फक्त माझा एक ध्यास आहे. गेले तीन वर्षे समाजाला माय बाप मानून काम करत आहे.मी गद्दारी केली नाही, जो करेल तो मराठा जातीचा नाही"

Manoj Jarange Patil : रेखा अंबुरे प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर केलेल्या आरोपांवर मोठा खुलासा
Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 10, 2026 | 11:41 AM

बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविक रेखा अंबुरे यांच्या कुणबी प्रमाणपत्रावरुन सुरु असलेल्या वादावर बीड प्रशासनाने खुलासा केला आहे. बीडच्या निवासी उप जिल्हाधिकारी यांचा अहवाल समोर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात आरोप केले होते. हे आरोप तथ्यहीन असल्याच आढळून आलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत, असं निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालातून समोर आलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आलेल्या पत्रानंतर जिल्हा प्रशासनाकडून फक्त चौकशी करण्यात आली.

नमुना-33 संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलं आहे. इतर कोणतीही कागदपत्रं संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी कार्यालयाच्या स्तरावर प्रलंबित नसल्याचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. जरांगे पाटील यांनी माध्यमांमध्ये केलेले आरोप चुकीचे असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांचे अधिकृत पत्र प्रसिद्ध झालं आहे. रेखा अंबुरे या माजलगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत मागास प्रवर्ग महिला गटातून निवडून आल्या होत्या. रेखा अंबुरे यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने जरांगे पाटील यांनी आरोप केले होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करत आरोप

माजलगावच्या वॉर्ड क्रमांक 1 मधून रेखा अंबुरे यांनी नगरसेविका पदाची निवडणूक जिंकली होती. विरोधी उमेदवाराच्या तक्रारीनंतर त्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं होतं. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं. त्यामुळे माजलगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मनोज जरांगे पाटील यांनी या मुद्यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करत आरोप केले होते.

सरकारविरोधात आक्रमक भूमिका

मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तिथे ते म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण हाच फक्त माझा एक ध्यास आहे. गेले तीन वर्षे समाजाला माय बाप मानून काम करत आहे.मी गद्दारी केली नाही, जो करेल तो मराठा जातीचा नाही” मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सध्या सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरुद्ध आरोपांची राळ उडवून दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us