
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर बारामतीतील राजकारण चांगलेच तापले आहे. ‘सहकार बचाव पॅनल’ने पीडीसीसी बँकेवर गंभीर आरोप केले आहेत. रात्री 11 वाजेपर्यंत बँक उघडी ठेवून तिथे मतदार यादी आढळल्याचा दावा सहकार बचाव पॅनलने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार बचाव पॅनल’च्या कार्यकर्त्यांनी पीडीसीसी बँकेत रात्री उशिरा जाऊन पाहणी केली. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पैशांचा वापर केला जात असल्याचा दावा या पॅनलने केला. विशेष म्हणजे या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारी बँकेत उपस्थित होते, असे रंजन तावरे यांनी म्हटले आहे. यामुळे बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “सूचना असल्याशिवाय कर्मचारी बँक कशाला उघडेल? लोकसभा निवडणुकीच्या वेळीही बँक उघडलेली होती. आज या बँकेमध्ये हे दुसऱ्यांदा घडत आहे. बँकेचे नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी ती बँक कशाला उघडेल? एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये आपल्याला दुसऱ्यांदा दिसते आहे. याचा अर्थ काय समजायचा तो समजा,” असे म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
या आरोपांवर पीडीसीसी बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदाळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बँक सायंकाळी साडेपाच वाजता बंद होते. नंतर फोन आल्यामुळे मी पुन्हा बँकेत आलो. संगणकीय काम सुरू असल्यामुळे काही कर्मचारी उशिरा थांबले होते. मात्र, माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या बँकेत कशा आल्या हे मला माहीत नाही.” असे मॅनेजर जगदाळे यांनी सांगितले.
या घटनेवर युगेंद्र पवार यांनीही संताप व्यक्त केला. “बँकेची वेळ सायंकाळी पाच वाजेपर्यंत असते, तरीही इतक्या वेळ बँक उघडी होती. त्या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांच्या याद्या होत्या, त्या का होत्या? सहकारी संस्था, शिक्षण संस्था यांच्या देखील याद्या त्या ठिकाणी होत्या. बँकेचा लोड वाढला असावा, त्यामुळे रात्री 11 पर्यंत ही बँक उघडी असावी,” अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवारांनी दिली.
“अलीकडच्या काळात पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय, त्यामुळे सर्वसामान्य सभासदांना अवघड झालं आहे. हे राजकारण बदलले पाहिजे.” असेही युगेंद्र पवार यांनी म्हटले. या घटनेमुळे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीतील चुरस आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.