मनोज जरांगे यांनी म्हटले, माझा एकच विरोधक… ‘त्या’ व्यक्तीवर पुन्हा हल्लाबोल

आपण कधीच खोटं बोलत नाही. आपली विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विधानसभेला मराठा मैदानात उतरणार आहे. काही जण स्वतःच्या स्वार्थासाठी माझे नाव वापरून जातीचे नुकसान करत आहे. माझे नाव वापरुन तुम्हाला आर्थिक फायदा काय मिळेल, हे माहीत नाही पण समाजाचे वाटोळे करू नका, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे यांनी म्हटले, माझा एकच विरोधक... त्या व्यक्तीवर पुन्हा हल्लाबोल
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Apr 28, 2024 | 10:25 AM

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा सक्रीय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतला नाही. परंतु विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार उभे करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. नारायण गड येथे आयोजित कार्यक्रमात मनोज जरांगे बोलत होते. यावेळी राज्यात आपला एकच विरोधक आहे. इतर कोणाला आपण विरोधक मानत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता सांगितले.

काय म्हणाले मनोज जरांगे

राज्यात येवला वाल्याला सोडता मी कुणाला विरोधक मानले नाही. आपले कोणीच विरोधक नाही. त्यांना कुणी ओबीसी नेता मानत नाही, असा हल्ला मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला. आपण लोकसभा निवडणुकीत नाही. या निवडणुकीत आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही. जे सगे सोयरे या विषयाच्या बाजूने आहे, त्याचा विचार करा. जे सगे सोयऱ्याच्या बाजूने नाही, त्यांना पाडा. त्यांचा पराभव असा करा की त्यांच्या दोन-तीन पिढ्या वर येऊ नये. त्यांना पाडण्यात आपला विजय आहे. मी कुणाला कॉल केला नाही की कुणाला मतदान करायचे हे सांगितले नाही. मराठा समाजाने आता ठरवायचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

समाजाचे नुकसान करु नका…

आपण कधीच खोटं बोलत नाही. आपली विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विधानसभेला मराठा मैदानात उतरणार आहे. काही जण स्वतःच्या स्वार्थासाठी माझे नाव वापरून जातीचे नुकसान करत आहे. माझे नाव वापरुन तुम्हाला आर्थिक फायदा काय मिळेल, हे माहीत नाही पण समाजाचे वाटोळे करू नका, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न

ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीवर चपलांचा हार घालण्यात आला आहे. तसेच गाडीवर शाई फेकण्यात आली आहे, यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मराठा असो किंवा ओबीसी असो असे कुणी करु नये. परंतु या माध्यमातून मराठ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. ओबीसी मत मिळवण्यासाठी काही ठिकाणी स्टँट केले जात आहे. प्रत्येकाला आपले मत आणि विचार मांडण्याचे स्वातंत्र आहे.