Marathwada Weather Update: मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार, ऑरेंज ॲलर्ट जारी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

| Updated on: Sep 09, 2021 | 4:08 PM

भारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागानं मराठवाड्यातील बहूतांश जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला होता. त्याप्रमाणं मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.

Marathwada Weather Update: मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार, ऑरेंज ॲलर्ट जारी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
मराठवाडा वेदर रिपोर्ट
Follow us on

मुंबई: भारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागानं मराठवाड्यातील बहूतांश जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला होता. त्याप्रमाणं मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औंरगाबाद ला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, उस्मानाबाद आणि लातूरला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलेला आहे. हवामान विभागाच्या या अंदाजानुसार मराठवड्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस

बीड जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या तुडुंब भरून वाहतायेत. शिरूर कासार तालुक्यातील सिंदफना नदीला देखील पूर आला आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे, आणि याच पाण्यातुन दुचाकीवरून दोन तरुण नदी पार करत होते. मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने दुचाकीसह दोन तरुण वाहून गेले. दोघांनाही पोहता येत असल्याने काही अंतरावर हे दोन्ही तरुण नदी काठावर कसेबसे बाहेर निघाले. राज्यात गेली काही दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून राज्यातील छोटे मोठे धरण भरली तर काही धरण भरण्यासाठी सज्ज झाली आहेत.गेले तीन दिवसापासुन मराठवाड्यात पावासाचा जोर कायम असुन बीड जिल्हयातील सर्व नदीपात्र वाहू लागली असुन जिल्हयातील बहुतांश तलाव भरले आहेत. दरम्यान,परळी शहर व तालुक्यात ही पावासाने चांगलीच हजरी लावली असून गेली बारा तासापासून सतत संततधार चालू आहे. वाण धरणासह तालुक्यातील सर्व तलाव तुडुंब भरली असून छोट्या मोठ्या नदी नाल्या वाहू लागल्या आहेत. परळी तालुक्यात पावसाच्या या परत आगमानाने शेतीच नुकसान झाले आहे.सोयाबीन,मूग आदी पिकाच नुकसान झाले आहे.हवामान खात्याने पुढेही चार दिवस पाऊस सक्रीय राहील असा अंदाज व्यक्त केला असून शेतकऱ्यांच्या चितेत भर पडली आहे.

परभणीत गोदाकाठावरील तालुक्यात मोठा पाऊस

परभणी जिल्ह्यात गोदावरी नदी काठावरील सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे. शिवाय बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन गंगाखेडचे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी केले आहे. तसेच गोदावरी नदी पात्रास मिळणारे ओढे-नाले यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे या ओढ्याच्या काठावरील गावातील नागरिकांनी ही दक्षता घ्यावी. नागरिकांनी नदीपात्रातील चल मालमत्ता,चीज वस्तु,वाहने, जनावरे, पाळीवप्राणी , शेती आवजारे व इतर साधने सुरक्षित ठिकाणी हलवावेत. नदीपात्रात कोणीही जाऊ नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

नांदेडमध्ये मुसळधार पाऊस

नांदेड मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावात पाणी साचले. तर छोट्या नदी नाल्याना पूर आला आहे. नरसी येथील महेबुब नगर परिसरात घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. बिलोली तालुक्यातील लघुळ गावात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. बिलोली ते लघुळ मार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मुखेड तालुक्यातील उंद्री गावात देखील पाणी साचलं. मंग्याळ आणि सावरगाव रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या दोन्ही गावांचा संपर्क तुटला. पहाटे पावसाने थोडी उसंत घेतली होती. पण सकाळ पासून पुन्हा पाऊस सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे अंबुलगा इथला पाझर तलाव ओसंडून वाहतोय. जीर्ण झालेल्या या तलावाच्या भिंतीतून मोठया प्रमाणात पाणी वाया जातेय, त्यामुळे हा तलाव फुटण्याची भीती निर्माण झालीय. या तलावाचे पाणी शेजारच्या शेतात शिरून जमिनी खरडून गेल्यायत, तर अंबुलगा गावाचा संपर्क या पाण्यामुळे तुटलाय. त्यामुळे जीव मुठीत धरून या भागातील नागरिक मदतीची प्रतीक्षा करतायत.

लातूरमध्ये सर्वदूर पाऊस

लातूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्री नंतर पाऊस कोसळतो आहे. सलग होणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. औसा आणि रेणापूर तालुक्यात ऊस आडवा पडला आहे तर शेतीत पाणी घुसल्याने काही ठिकाणी सोयाबीन वाहून गेले आहे. नदी -ओढ्याना आता बऱ्यापैकी पाणी आल्याने ओसंडून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील मुख्य नदी असलेली मांजरा नदी देखील आता ओसंडून वाहू लागली आहे. लातूर शहराच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या मांजरा धरणातही 114 दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे . या धरणाची एकूण साठवण क्षमता 224 दलघमी आहे . आज सकाळ पासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे ,वातावरण ढगाळ ,गारठा पसरलेला आहे .

हिंगोलीमध्ये हवामान खात्याच्या दिलेल्या अंदाजानुसार हिंगोलीत जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही रात्री पासून ठीक ठिकाणी पाऊस पडतोय. सखल भागात पाणी साचलं असून सतत पडत असलेल्या पावसामुळे ऊस सोयाबीन तर काढनीला आलेल मूग उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

इतर बातम्या:

चिपळूणमध्ये भरतीच्या वेळी शहरात पुन्हा पाणी भरण्याची शक्यता, नगरपालिकेकडून मदतीसाठी संपर्क क्रमांक जाहीर

Ratnagiri Rain | दापोलीच्या इतिहासातील थैमान घालणारा पाऊस, चिपळूणमध्येही 16 तासापासून मुसळधार, सतर्कतेचा इशारा

Marathwada Weather Report IMD issue oragne alert to most districts of Marathwada predicted heavy RainFall at various places