महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला… रेवड्या वाटू नका असं सांगणार आहात का? राज ठाकरेंचा पंतप्रधानांना सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मोडकळीला आल्याची टीका केली असून, जनतेवर महागाईचा भार का टाकला जातोय असा सवाल केला आहे.

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला... रेवड्या वाटू नका असं सांगणार आहात का? राज ठाकरेंचा पंतप्रधानांना सवाल
raj thackeray pm modi ladki bahin
| Updated on: May 12, 2026 | 10:49 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल, डिझेल आणि सोने खरेदी करताना काटकसर करा, असे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर आता विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. नुकतंच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लांबलचक पत्र लिहिलं आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे, या रेवड्या वाटणे थांबवणार का? असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.

तर या रेवड्या वाटू नका

राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी एकेकाळी खिल्ली उडवली होती, त्याच योजनांचा वापर करून निवडणुका जिंकल्या जात आहेत. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून, ही योजना केवळ निवडणुकीपुरता केलेला अफाट पैशाचा खेळ आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

महिलांना सक्षम करण्याऐवजी त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि महागाईच्या रूपाने ते पुन्हा काढून घ्यायचे, हा खेळ थांबवा. जर अर्थव्यवस्था खरोखरच नाजूक असेल, तर या रेवड्या वाटू नका, असे ठामपणे सांगण्याची हिंमत पंतप्रधान दाखवतील का? असा सवालही राज ठाकरेंनी केला आहे.

किती टक्के लोकांना परदेशात जाणं आता परवडत?

पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. देशाची अर्थव्यवस्था वरून सुदृढ वाटत असली तरी आतून कमकुवत झाली आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

केवळ इराण-इस्रायल युद्धावर खापर फोडून चालणार नाही

तुमची ‘मन की बात’ आता खूप झाली, आता खऱ्या अर्थतज्ज्ञांच्या मनातील गोष्ट ऐका. रुपयाचे अवमूल्यन का झाले आणि आरबीआयच्या तीन गव्हर्नर्सनी राजीनामे का दिले, याचे उत्तर जनतेला मिळायला हवे. केवळ इराण-इस्रायल युद्धावर खापर फोडून चालणार नाही. संसदेत देशाच्या आर्थिक स्थितीवर सविस्तर चर्चा करा आणि देशाला सत्य सांगा,” असे आवाहन राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केले आहे.

Follow Us