मुंबई-नाशिक महामार्ग मृत्यूचा सापळा, TDRF जवानाच्या मृत्यूनंतर ‘तो’ खड्डा बुजवला, परंतू अन्य खड्ड्यांचे काय ?

शहापूरच्या भारंगी नदी पुलावरील खड्ड्यात अपघात होऊन बाईकवरुन प्रवास करणाऱ्या टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारने संबंधित खड्डा बुजवला आहे. मात्र, संपूर्ण मुंबई- नाशिक महामार्गाची अक्षरश: चाळण झाली असल्याने दुरुस्तीची मागणी होत आहे.

मुंबई-नाशिक महामार्ग मृत्यूचा सापळा, TDRF जवानाच्या मृत्यूनंतर तो खड्डा बुजवला, परंतू अन्य खड्ड्यांचे काय ?
Mumbai-Nashik Highway pothole
| Updated on: Aug 03, 2026 | 8:38 PM

मुंबई ते नाशिक महामार्गावर भलेमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहे. नुकताच शहापूरच्या भारंगी नदी पुलावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत यहा खड्डा बुजवला होता. मात्र, असे एकेक खड्डे बुजवण्याऐवजी मुंबई ते नाशिक महामार्गाची झालेली चाळण बुजवून प्रवाशांचे प्राण वाचवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

मुंबई ते नाशिक महामार्गाची पावसाने अक्षरश: चाळण झाली असून या महामार्गावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. शहापूरच्या भारंगी नदी पुलावरील खड्ड्यात अपघात होऊन टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा मृत्यू झाला होता. विकास लहू गोरे हे भिवंडी येथील इमारत कोसळल्यानंतर मदतीसाठी धावले होते. त्यांच्या बाईकला खड्ड्यात अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने तो खड्डा बुजवला होता. मात्र,अवघ्या दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरील आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ महामार्गावर अजूनही मोठमोठे खड्डे कायम आहेत. काही खड्डे दीड ते दोन फूट खोल आणि तब्बल सहा फूट रुंद असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.

या महामार्गावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे भरधाव वाहनांचे संतुलन बिघडून अपघाताचा धोका वाढत आहे.वाहन खड्ड्यात आदळल्यानंतर अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे चालकांना रस्त्याच्या कडेला थांबून वाहनांची पुन्हा पाहणी करावी लागत आहे. वाहनचालक आणि स्थानिक संघटनांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “टोल नाक्यावर पैसे न दिल्यास वाहन सोडले जात नाही, मग महामार्गावरील हे धोकादायक खड्डे प्रशासनाला दिसत नाहीत का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे एकेक खड्डा बुजवून हा प्रश्न सुटणारा नाही; संपूर्ण मुंबई-नाशिक महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us