मुंबईत 27 जूनपासून 10 टक्के पाणीकपात; दमदार पावसाअभावी जलाशयांमध्ये अपुरा पाणीसाठा

| Updated on: Jun 24, 2022 | 8:39 PM

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखीलही 10 टक्के कपात लागू राहणार आहे.

मुंबईत 27 जूनपासून 10 टक्के पाणीकपात; दमदार पावसाअभावी जलाशयांमध्ये अपुरा पाणीसाठा
मुंबईत सोमवारपासून पाणी कपात
Follow us on

मुंबईः महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये दमदार पावसाअभावी पुरेसा पाणीसाठा नसल्याने सोमवार 27 जूनपासून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) क्षेत्रात 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका (Thane, Bhiwandi Municipal Corporation) व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्येही 10 टक्के कपात (10 percent water reduction)  लागू करण्यात येणार आहे. यंदाचा पावसाळा सुरू होऊनही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा सुमारे 70 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

सात जलाशयांमध्ये पाणी कमी

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत आज या सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त 1 लाख 41 हजार 387 दशलक्ष लिटर म्हणजे 9.77 टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्याच दिवशी हा जलसाठा 15.54 टक्के इतका होता.

मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम

दमदार पावसाअभावी हीच परिस्थिती यापुढेही सुरू राहिल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होणार आहे.  ही बाब लक्षात घेता, दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोमवार 27 जूनपासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना जेवढा पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्येदेखील ही 10 टक्के कपात लागू राहणार आहे.

मुंबईकरांना महानगरपालिकेतर्फे आवाहन

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने सर्व मुंबईकरांना आवाहन करण्यात आले आहे की, दमदार पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता दैनंदिन पाणी वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा व महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.